
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या रंजक वळणावर आली आहे. शालिनी आणि महेंद्र यांच्या लग्नसोहळ्याची धामधूम सुरू असताना मालिकेत नवे ट्विस्ट आणि रहस्यांची भर पडताना दिसत आहे.
मेहंदी, हळद आणि लग्नाच्या विविध विधींमुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. या भावनिक क्षणांदरम्यान RK आणि मोहिनी यांच्यातील नातेसंबंधही नव्या टप्प्यावर पोहोचताना दिसत आहेत. काही प्रसंगांमध्ये RK मोहिनीची साथ देताना दिसतो, तर काहीवेळी त्याच्या कृतींमागचा खरा हेतू काय आहे, याबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात.
दरम्यान, लग्नाचा दिवस उजाडतो. वरात दणक्यात निघते आणि सर्वजण आनंदात लग्नमंडपात पोहोचतात. मात्र, शुभमंगलाचा क्षण जवळ आलेला असतानाच प्रतापरावांची अचानक एन्ट्री होते आणि संपूर्ण वातावरणच बदलून जाते. त्यांच्या धक्कादायक दाव्यांमुळे उपस्थितांना मोठा धक्का बसतो आणि लग्नसोहळ्यात गोंधळाचे वातावरण निर्माण होते.
या अनपेक्षित परिस्थितीत मोहिनी सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसते, तर RK देखील मध्यस्थी करत काही महत्त्वाची पावले उचलताना दिसणार आहे. प्रतापरावांच्या आगमनामागचा खरा उद्देश काय आहे? त्यांच्या दाव्यांमुळे शालिनी आणि महेंद्र यांच्या आयुष्यात कोणते नवे वादळ निर्माण होणार? आणि या सर्व गोंधळात RK मोहिनीसाठी असे काय करणार आहे, जे ती आयुष्यभर विसरू शकणार नाही?
‘पेड्डी’साठी राम चरणच्या मेहनतीचे श्याम कौशल यांनी केले कौतुक; आमिर खानशी तुलना करत काय म्हणाले?
या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना १४ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या महारविवार विशेष भागात मिळणार आहेत. भावना, नाट्य, रहस्य आणि थराराने भरलेला हा भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.