
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आजच्या तरुण पिढीला अनेकदा “कमिटमेंटपासून दूर पळणारी पिढी” अशी ओळख दिली जाते. मात्र अभिनेता सिद्धार्थ मेनन याच्या मते हा समज चुकीचा आहे. ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या मालिकेच्या निमित्ताने बोलताना त्याने आधुनिक नातेसंबंध आणि कमिटमेंटबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
कमिटमेंट हा आजच्या नात्यांमधील सर्वात मोठा प्रश्न आहे का, असा प्रश्न विचारला असता सिद्धार्थ म्हणाला, “मला असं अजिबात वाटत नाही. उलट, कमिटमेंटबद्दल प्रश्न विचारणारी व्यक्ती त्याचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असते. मीही लहानपणापासून या संकल्पनेवर विचार करत आलो आहे. पूर्वी कमिटमेंटबद्दल माझे ठरावीक विचार होते, पण काळानुसार त्यांच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे.”
तो पुढे म्हणाला, “आजची पिढी कमिटमेंट नाकारत नाही, तर नातेसंबंध कसे असावेत, याबद्दल स्वतःची व्याख्या तयार करत आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या चौकटी प्रत्येकासाठी योग्य असतीलच असं नाही. प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याला आणि मूल्यांना साजेसं नातं निवडण्याचा अधिकार असायला हवा.”
सिद्धार्थचे हे विचार ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या मालिकेच्या कथेशीही जवळून संबंधित आहेत. आधुनिक प्रेम, ऑफिसमधील नातेसंबंध आणि बदलत्या भावनिक समीकरणांवर आधारित ही मालिका तरुण पिढीच्या विचारांना वेगळ्या दृष्टिकोनातून मांडते.
प्रेम आणि कमिटमेंटबाबत समाजात सुरू असलेल्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मेननने मांडलेला दृष्टिकोन अनेकांना विचार करायला भाग पाडणारा आहे. त्याच्या मते, Gen-Z पिढी नात्यांपासून दूर जात नाही, तर ती अधिक प्रामाणिक, समंजस आणि स्वतःच्या अटींवर नातेसंबंध जगण्याचा प्रयत्न करत आहे.