
अभिनेत्री सुहास परांजपे यांनी उलडगले भूमिकेचे कंगोरे
ही व्यक्तिरेखा नक्की कशी आहे असा प्रश्न आल्यानंतर सुहास यांनी सांगितले की, “दीपज्योतीमधील माझ्या व्यक्तिरेखेचे नाव ‘सुलोचना’ आहे. सुलोचना ही पुरुषोत्तम गायकवाड यांची धाकटी बहीण असून त्यांच्या तीन मुलांची आत्या आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. तिचे आपल्या तिन्ही भाच्यांवर खूप प्रेम आहे, पण तिचा जास्त जीव ‘दीप’वर आहे. या मालिकेत असं दिसेल की सुलोचनाचा नवरा आणि पुरुषोत्तम बिझनेस पार्टनर असतात, पण तिचा नवरा व्यवसायात पुरुषोत्तमची फसवणूक करतो. हा खोटेपणा तिला सहन होत नाही, म्हणून ती स्वतःचे घर सोडून भावाकडे राहायला येते. वहिनीच्या पश्चात ती आपल्या भावाच्या मुलांचा सांभाळ करते आणि त्यांचे घरही सावरते.”
ही भूमिका का स्वीकारावीशी वाटली? “या भूमिकेसाठी मला ‘फ्रेम्स प्रॉडक्शन’मधून फोन आला होता. याआधी त्यांच्यासोबत काम केलं असल्याने संपूर्ण युनिट आणि प्रॉडक्शन हाऊस माझ्या परिचयाच होत. त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येईल असं मला वाटलं आणि सध्या शूटिंग करताना ती मजा येतेय. सेटवरची सर्व मंडळी खूप छान आहेत. त्यांनी मला पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली, याचा मला खूप आनंद झाला.माझी ही भूमिका आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे, कारण याआधी मी एका मालिकेत पूर्णपणे खलनायिका साकारली होती. मात्र, ‘दीपज्योती’ मालिकेत मी खलनायिका नसून सर्वांना सांभाळून घेणारी, प्रेम करणारी एक साधी गृहिणी आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्या आधीच्या कामापेक्षा पूर्णपणे वेगळी आणि सकारात्मक आहे.”
कलाकारांशी आधीपासूनच ओळख होती का? “माझे सहकलाकार जवळजवळ सगळेच नवीन आहेत; फक्त शलाकासोबत मी याआधी काम केलं आहे. सध्या मी ज्यांच्यासोबत काम करत आहे, ते सर्वच कलाकार मनापासून आणि खूप छान काम करत आहेत. सेटवरची टीम आधीच ओळखीची असल्यामुळे वातावरण खूप आनंदी असतं.”
अभिनय क्षेत्रात कशी आलीस? या प्रश्नावर सुहासने सांगितले की, “अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय असा घेतला कि, पूर्वी मी नोकरी करत होते . त्यानंतर चंद्रशेखर गोखले यांचं ‘अनोळखी ओळख’ नावाचं व्यावसायिक नाटक माझ्याकडे आलं. ते माझं अभिनय क्षेत्रातील पहिलंच नाटक होतं. त्यानंतर ‘रानभूल’, ‘ऑल द बेस्ट’ अशा नाटक आणि मालिकांचा प्रवास सुरू झाला आणि मग मी अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मला वाचनाची खूप आवड आहे. तसेच मला नवनवीन ठिकाणी फिरायला प्रचंड आवडतं. पूर्ण जग फिरण्याचं माझं स्वप्न आहे.”