
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
अक्षया आणि भूषण वाणी यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. सुरुवातीला या सगळ्या चर्चांमुळे अक्षयाला हे स्वीकारणं कठीण गेलं. मात्र, कालांतराने या विषयावर आपल्याला बोलावंच लागेल, असं तिला वाटलं.
याबाबत बोलताना अक्षया म्हणाली, “जेव्हा माझ्या घटस्फोटाची बातमी समोर आली, तेव्हा अनेकांनी ही बातमी प्रसारित केली होती. या सगळ्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जोरदार चर्चा झाली. सुरुवातीला मला हे सगळं पटलं नाही. पण नंतर कुठेतरी वाटलं की, मला या गोष्टीवर कधीतरी बोलावंच लागेल. जे काही लोकांनी वाटलं आहे, पाहिलंय.. तर हो! ही गोष्ट खरी आहे.”
अक्षयाने घटस्फोटाबाबत स्पष्टपणे सांगतानाच भूषण वाणीसोबतचं नातं आता कोणत्या स्वरूपाचं आहे, हेही सांगितलं. दोघेही आजही चांगले मित्र असल्याचं तिने म्हटलं. तसंच दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असल्याने भविष्यात एकत्र काम करण्याची संधी मिळाली, तर त्यांना नक्कीच आवडेल, असंही अक्षयाने सांगितलं.
“आम्ही दोघे आजही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही दोघंही एकाच क्षेत्रातले आहोत. त्यामुळे पुढे जर अशी वेळ आली, तर आम्हाला एकत्र काम करायला आवडेल. आपण आयुष्यात गोष्टी ‘लेट गो’ करायला शिकलं पाहिजे,” असं अक्षया म्हणाली.
नात्यांमध्ये एखाद्या व्यक्तीला पुढे जायचं असेल, तर तिला थांबवण्यात अर्थ नसतो, असा महत्त्वाचा संदेशही अक्षयाने दिला. आपल्या जवळच्या व्यक्तीने दिलेला सल्ला तिने यावेळी सांगितला.
“माझ्या जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं होतं की, प्रेमात माणसाने नेहमी नि:स्वार्थी असलं पाहिजे, स्वार्थी नाही. त्यामुळे एखाद्याला आपल्या आयुष्यातून कायमच निघून जायचं असेल, तर आपण त्याला जाऊ द्यायचं. त्याला थांबवण्यात काहीही अर्थ नाहीये,” असं अक्षया म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “मग ती मैत्री असो, कुटुंब असो किंवा नवरा-बायकोचं नातं असो… तुम्ही कोणालाही थांबवू शकत नाही. यादरम्यान खूप त्रास होतो. मी रडलेय… पण आपलं आयुष्य इथेच थांबत नाही.”
वैयक्तिक आयुष्यातील भावनिक चढ-उतारांचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो, असंही अक्षयाने सांगितलं. मात्र, कलाकार असल्याने कामाच्या ठिकाणी स्वतःला सावरावं लागतं. त्यामुळेच ती आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करते.
“बरं, दु:ख चेहऱ्यावर दिसतं. कलाकार असल्याने त्याकडे लक्ष ठेवावं लागतं. म्हणूनच मी माझं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवते. आता पुढे बघुयात, आयुष्य कुठे घेऊन जातंय,” असं म्हणत अक्षयाने आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा निर्धार व्यक्त केला.
अक्षयाच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर तिच्या आणि भूषण वाणी यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विभक्त झाल्यानंतरही दोघांनी मैत्री कायम ठेवली असून, भविष्यात कामाच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्यता असल्याचं अक्षयाने स्पष्ट केलं आहे.