
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Salman Khan: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आणि अभिनेता सलमान खान यांनी २००८ मध्ये ‘युवराज’ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. मात्र, या चित्रपटाच्या आधी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. एका पार्टीत झालेल्या या वादाचे रूपांतर थेट हातापाईपर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणात सलमान खान यांचे वडील आणि प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान यांना मध्यस्थी करावी लागली होती.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सुभाष घई यांनी सलमानसोबत ‘युवराज’मध्ये काम करण्यामागची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की, चित्रपटासाठी सलमान खान यांच्या भावाने त्यांच्याशी संपर्क साधला होता. “तुम्ही सलमानसोबत चित्रपट का बनवत नाही?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर घई यांनी सलमान या चित्रपटासाठी तयार आहेत का, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी एक कथा लिहिली आणि सलमानसाठी वेगळी भूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीत सुभाष घई यांनी सलमान खानसोबत झालेल्या जुन्या वादाचा किस्साही सांगितला. “चित्रपटापूर्वी आमचं भांडण झालं होतं. हातापाईही झाली होती. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना फटकारलं,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
घई यांनी पुढे सांगितलं की, ही घटना एका पार्टीदरम्यान घडली होती. सलमान त्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता आणि काही चुकीच्या गोष्टी बोलत होता. घई यांनी त्याला तसं बोलू नकोस, असं सांगितलं. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.
सलमानने घई यांच्यावर काही गोष्टींबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर “डायरेक्टर म्हणून तो माझा निर्णय होता,” असं घई यांनी स्पष्ट केलं. मात्र, वाद वाढत गेला आणि सलमानने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घई यांनी त्याला असं न करण्यास सांगितलं, पण परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दोघांमध्ये हातापाई झाली.
या घटनेनंतर सलीम खान यांनी मुलाला चांगलंच झापलं. दुसऱ्याच दिवशी सलीम खान यांनी सुभाष घई यांना फोन करून सलमानने आईला घडलेला प्रकार सांगितल्याचं म्हटलं. “मी त्याला ओरडलो आहे,” असं सलीम खान यांनी घई यांना सांगितलं.
इतकंच नाही तर त्यांनी सलमानला सुभाष घई यांच्या घरी जाऊन माफी मागण्यास सांगितलं. त्यानंतर सलमान घई यांच्या घरी गेला आणि अत्यंत नम्रपणे त्यांची माफी मागितली.
सलमानने वडिलांचा आदेश मानून माफी मागितल्याने सुभाष घई यांना त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. त्यांनीही तो प्रसंग तिथेच विसरून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही अधूनमधून भेटत राहिले आणि अखेर २००८ मध्ये ‘युवराज’ या चित्रपटासाठी त्यांनी एकत्र काम केलं.