
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आनंदी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली असून, आता या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच एन्ट्री घेणार आहे. ही महत्त्वपूर्ण भूमिका सई रानडे साकारणार असून, तिच्या आगमनामुळे मालिकेतील नाट्य अधिक रंगतदार होण्याची शक्यता दिसत आहे.
शलाका ही प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची मेहुणी आहे. युगंधरची दिवंगत पत्नी समिधा आणि शलाका या जुळ्या बहिणी असल्या तरी त्यांच्या स्वभावात जमीन-आस्मानाचा फरक आहे. समिधा जिथे शांत, समंजस आणि प्रेमळ स्वभावाची होती, तिथे शलाका मात्र उथळ, अहंकारी आणि स्वतःच्या सौंदर्य आणि संपत्तीचा गर्व बाळगणारी आहे. युगंधरने शलाकाऐवजी समिधाची जीवनसाथी म्हणून निवड केली, ही गोष्ट शलाकाच्या मनात खोलवर घर करून आहे.
यामुळे शलाकाने युगंधरचा नाश करण्याचा निर्धार केला आहे. आपल्या पैशाच्या बळावर तिने गारमेंट व्यवसायात स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे आणि युगंधरला हरवणं हाच तिच्या आयुष्याचा एकमेव उद्देश बनला आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत ती आपलं ध्येय साध्य करत नाही, तोपर्यंत रंगीत कपडे न घालण्याचा निर्धार करत ती केवळ काळ्या रंगाचे कपडे परिधान करते. ज्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेला आणखी गूढ आणि प्रभावी रंग मिळतो.
गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत
शलाकाच्या एन्ट्रीनंतर मालिकेतील नातेसंबंध, संघर्ष आणि भावनिक नाट्य अधिक तीव्र होणार आहे. युगंधर आणि शलाका यांच्यातील संघर्ष कसा उलगडतो, कोण कुणावर भारी पडतो, आणि या सगळ्यात ‘आनंदी’च्या आयुष्यावर काय परिणाम होतो. हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. या सगळ्या थरारक घडामोडी पाहण्यासाठी ‘आनंदी’ मालिका प्रेक्षकांना रात्री ९:३० वाजता स्टार प्रवाहवर पाहावी लागेल.