
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सामाजिक आणि भावनिक विषयांना नेहमीच प्राधान्य देणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर आता आणखी एक प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १६ मार्चपासून ‘आनंदी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ही मालिकाप्रेक्षकांचं मनोरंजन करतानाच त्यांना सकारात्मकतेचा संदेश देणार आहे.
ही कथा आहे आनंदी नावाच्या तरुणीची. एका अपघातात तिची दृष्टी गेली असली तरी जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन मात्र अत्यंत आशावादी आहे. डोळ्यांनी जग दिसत नसले तरी मनाच्या नजरेतून ती प्रत्येक क्षण अनुभवते. अंधत्व तिच्यासाठी मर्यादा नसून सामर्थ्य आहे. तिची संवेदनशीलता आणि माणुसकी तिला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. “डोळे कधी भ्रम निर्माण करू शकतात, पण मन नेहमी सत्य दाखवतं,” हा तिच्या आयुष्याचा आधार आहे.
या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्टार प्रवाह नेहमी वेगळ्या व्यक्तिरेखा असलेल्या पात्रांची कथा निवडतं. आपल्या अवती-भवती अशी माणसं दिसतात. आनंदीची गोष्ट सादर करताना अभिमान वाटतोय कारण दृष्टी नसली तरी दृष्टीकोन असलेली मुलगी तिच्या नजरेतून हे जग कसं पहाते हे पाहून नक्की स्फुर्ती आणि प्रेरणा मिळेल. नावाप्रमाणे आनंदी सुख आणि आनंद पसरवत मन जिंकेल याची खात्री आहे. आयुष्यात खचून न जाता एक सकारात्मक जीवन जगता येतं ही या गोष्टीची ताकद असेल.’
या मालिकेतून नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर मालिका विश्वात पदार्पण करत आहे. आजवर अनेक नाटकांच्या माध्यमातून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखिका अशी तिहेरी भूमिका पार पाडलेल्या जाईसाठी ‘आनंदी’ ही भूमिका एक नवा आणि आव्हानात्मक अनुभव आहे. या भूमिकेविषयी सांगताना जाई खांडेकर म्हणाली, ‘आनंदी नावाप्रमाणेच आनंदी स्वभावाची मुलगी आहे. ही फक्त एक भूमिका नाही, तर ती एक भावना आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या गोष्टी आनंदी मनाने अनुभवते आणि तिच तिची खरी ताकद आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे. या भूमिकेसाठी आम्ही एका अंध मुलांच्या संस्थेत जवळपास आठवड्याभराचं वर्कशॉप केलं. या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी खूप जवळून अनुभवता आल्या. प्रेक्षकांना आनंदी नक्कीच आपलीशी वाटेल असा मला विश्वास आहे.’