
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ मध्ये लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या कथानकात अचानक होणाऱ्या या बदलामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सतत नवीन ट्विस्ट, धक्कादायक घटना आणि नव्या पात्रांची एन्ट्री होत असते. त्यामुळे कथा अधिक रंजक बनते आणि प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता कायम राहते. याच परंपरेत आता ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतही एक महत्त्वाचा बदल घडणार आहे.
‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली आहे. मालिकेत नुकताच मोठा खुलासा झाला असून ईश्वरी आणि अर्णव यांनी राजेशचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. स्मृतीभ्रंश झाल्याचा खोटा आव आणत राजेशने राजेशिर्के कुटुंबासह सर्वांच्या भावनांशी खेळ केला होता. मात्र अर्णव आणि ईश्वरी यांच्या हुशारीमुळे त्याचा खोटेपणा उघड झाला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.
या संपूर्ण घडामोडीदरम्यान राजेशने सात्विक फॅशन्सचे काही शेअर्स आपल्या नावावर करून ठेवले होते. मात्र, कथानकात आणखी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. राजेशने कंपनीची ७ टक्के भागीदारी एका अनोळखी व्यक्तीला विकली असून ही व्यक्ती म्हणजे ‘मिसेस देशमुख’ असल्याचे समोर आले आहे.
मालिकेत ‘मिसेस देशमुख’ ही भूमिका अभिनेत्री मंजुषा गोडसे साकारताना दिसणार आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे कथानकात मोठा बदल होणार असून अर्णवसमोर नवे आणि अधिक कठीण आव्हान उभे राहणार आहे. ही एन्ट्री केवळ कथेला नवे वळण देणारी नसून संपूर्ण मालिकेतील शक्ती-समीकरण बदलणारी ठरणार आहे.
या नव्या ट्विस्टमुळे अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण होणार असून पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना अधिक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. सध्या या बदलाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मालिकेत येणारा हा नवा अध्याय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार हे निश्चित आहे.
दरम्यान, मंजुषा गोडसे यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेत त्यांनी साकारलेली सरोज चांदेकर ही भूमिका विशेष गाजली होती.या मालिकेत त्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली असली तरीही त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांनी त्या व्यक्तिरेखेलाही मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. नकारात्मक भूमिकेत असूनही त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली.आता ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत त्यांची एन्ट्री होत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे मालिकेत आणखी नवे वळण आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.