
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील नव्याने सुरू झालेली ‘सनई चौघडे’ मालिका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधील एका वादग्रस्त सीनमुळे प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 16 मार्चपासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असले, तरी आता एका सीनमुळे सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली आहे.
23 मार्चला प्रसारित होणाऱ्या भागाचा प्रोमो समोर आला आणि त्यातील एक प्रसंग पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. प्रोमोमध्ये शर्वरी ही व्यक्तिरेखा जयच्या आजीला शोधत घरातील एका अंधाऱ्या खोलीत जाते. त्या खोलीत टेबलावर सोन्याचे दागिने ठेवलेले असतात. अंधारामुळे काहीच स्पष्ट दिसत नसताना शर्वरीचा टेबलला धक्का लागतो आणि एक सोन्याचा हार खाली पडतो. ते काय पडले आहे हे पाहण्यासाठी ती खाली वाकते आणि हार उचलते.
इतक्यात जयची आई तेजस्विनी तिथे येते आणि शर्वरीच्या हातात हार पाहते. परिस्थिती समजून घेण्याऐवजी ती थेट शर्वरीवर चोरीचा आरोप करते. शर्वरी तिचं म्हणणं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना तेजस्विनी तिचं काहीही न ऐकता तिला सगळ्यांसमोर ओढत बाहेर आणते. इतकंच नव्हे, तर सर्वांसमोर तिच्या कानशिलात मारते. हाच तो सीन आहे, ज्यामुळे प्रेक्षक संतप्त झालेले दिसत आहेत.
सोशल मीडियावर या सीनविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक प्रेक्षकांनी मालिकेतील स्त्री पात्रांवर वारंवार होणाऱ्या अशा अत्याचारात्मक प्रसंगांवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले, “हा काय प्रकार आहे? प्रत्येक मालिकेत नायिकेला कानशिलात मारण्याचे सीन दाखवले जातात. सावली, पारू, कमळी, तारिणी, श्रावणी आणि आता शर्वरी सगळ्यांनाच अशा प्रकारे दाखवले जाते. कृपया असे सीन दाखवणे बंद करा.”
प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, मनोरंजनाच्या नावाखाली महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचे असे चित्रण करणे योग्य नाही. यामुळे चुकीचा संदेश समाजात पोहोचू शकतो. मालिकांनी सकारात्मक आणि सशक्त स्त्रीप्रतिमा दाखवावी, अशीही मागणी प्रेक्षकांकडून होत आहे. ‘सनई चौघडे’ मालिकेच्या या सीनमुळे निर्माण झालेल्या वादानंतर आता निर्माते आणि वाहिनी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रेक्षकांचा वाढता रोष लक्षात घेता, भविष्यात अशा सीनमध्ये बदल केला जाईल का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.