
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता सुहास शिरसाट एका प्रेमळ बाबाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘सुभाष परब’ असं ह्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल सुहास यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. सनई चौघडे मध्ये माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे सुभाष परब. तो लालबाग-परळच्या चाळीत राहतो. तो एक बेस्ट बस कंडक्टर आहे. बायको आणि चार मुलींसोबत त्याचं खूप चांगलं, मैत्रीचं नातं आहे. कुठल्याही गोष्टीचं तो जास्त टेन्शन घेत नाही. जी परिस्थिती आहे, त्यामध्ये तो खुश आहे, जे होईल ते चांगलंच होईल, स्वामी आहेत असा त्याचा खूप मोठा श्रद्धाभाव आहे. सुभाष परब या व्यक्तिरेखेसाठी आमचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी मला सर्वप्रथम कॉल केला होता. जेव्हा मला कळलं की ते स्वतः पहिल्यांदा निर्माते म्हणून काम करणार आहेत, तर त्या गोष्टीचा मला जास्त आनंद झाला. त्यात त्यांनी या भूमिकेसाठी मला विचारल्यामुळे मला खूपच भारी वाटलं. माझा काय रोल आहे, काय कॅरेक्टर आहे हे मी त्यांना न विचारताच, त्यांच्यावर विश्वास ठेवून मी लगेच माझ्या भूमिकेसाठी होकार दिला. या भूमिकेसाठी तयारी तशी सुरूच आहे, कारण भूमिका कंडक्टरची असल्यामुळे कंडक्टर कसे राहतात, त्यांचे हावभाव आत्मसात करून भूमिका साकारण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नात आहे. लालबाग-परळ अशा ठिकाणी राहत असल्यामुळे लालबाग-परळच्या भाषेत कसं बोलायचं याची तयारी सुरूच आहे. माझी ही भूमिका नक्कीच खूप वेगळी आहे. या मालिकेत सतत मस्ती-मजाक करणारा, आपल्या बायको-मुलींवर प्रेम करणारा, सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणारा, पडती बाजू सांभाळून घेणारा असा हा सुभाष आहे. त्यामुळे ही भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. अशा हसतमुख, विविध हावभावी भूमिकेसाठी नक्कीच तयारी करावी लागते, या भूमिकेतून मला माझा मजेशीर स्वभाव प्रेक्षकांना दाखवून द्यायचा आहे, शूटिंग करताना मला खूप मजा येतेय.
सेटवर आमची सगळ्यांची ट्युनिंग खूप चांगली झाली आहे, कारण ज्या माझ्या मुलींच्या भूमिका करतात त्या मुली सेटवर सतत “पप्पा, पप्पा” असं करत असतात, त्यामुळे मला खूप छान वाटतं. मेघनाताई आणि माझ्यातही खूप छान पद्धतीने आता ट्युनिंग झालंय. कारण सुरुवातीचे दहा दिवस जेव्हा शूटसाठी आम्ही सगळे बाहेर होतो, तेव्हा दिवसभर एकत्र , जेवण-खाणं एकत्र करायचो, त्यामुळे चांगलं ट्युनिंग जमलं आणि सगळ्यांचे स्वभाव कळले. मुळातच आम्ही सगळे एकत्रितरीत्या काम करतो.
शूटिंगदरम्यान किस्सा सांगायचा झाला तर जेव्हा मला प्रोमो शूटसाठी कॉल टाइम आला, तेव्हा मला सकाळी आठ वाजता शूटसाठी हजर राहायचं असं सांगण्यात आलं होतं. तेव्हा मी राजू सरांना म्हटलं की सकाळी आठचा कॉल टाइम आहे सर. तर सर पटकन म्हणाले हो चार-पाच वाजेपर्यंत फ्री होशील.” तेव्हा मला वाटलं की संध्याकाळी चार-पाच वाजेपर्यंत आम्ही फ्री होऊ. पण त्यानंतर सरांच्या असिस्टंटने सांगितलं की काहीतरी ऐकण्यात गडबड झाली आहे, कारण सर म्हणाले चार-पाच वाजता म्हणजे सकाळचे चार-पाच वाजेपर्यंत, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यानंतर खरंच आमचं पहाटे चार वाजता पॅकअप झालं.