
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाह वाहिनीवरील सुपरहिट मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली. हा सोहळा फक्त कलाकारांपुरता मर्यादित न राहता चाहत्यांसाठीही अविस्मरणीय क्षण ठरला. तुफान चाहत्यांच्या उपस्थितीत रंगलेली वरात आणि संगीताची गजबजलेली वातावरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. मालिकेतील हा उत्साहपूर्ण प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ स्मरणात राहील असा अंदाज आहे.
विंटेज कार, पारंपरिक लग्नाची गाणी, वऱ्हाडी मंडळी आणि चाहत्यांच्या प्रचंड उपस्थितीत निघालेली ही वरात विशेष आकर्षण ठरली. मराठी मालिका विश्वात प्रथमच अशा पद्धतीने थेट प्रेक्षकांसोबत लग्नाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. चाहत्यांचं प्रेम पाहून मालिकेतील सर्वच कलाकार भारावून गेले होते. या आनंदसोहळ्याचा समारोप कलाकारांनी लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेऊन केला.
जीवाची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक सांगळे म्हणाला, ‘मी मुळचा लालबागचा. मालिकेतल्या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने होतेय यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील.
नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस म्हणाली, ‘प्रेक्षकांसोबत अशा पद्धतीने लग्न साजरं करणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर अनुभव आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नव्या प्रवासाची सुरुवात करता आली, याचा खूप आनंद आहे.’
पार्थची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकर म्हणाला, ‘ढोल-ताशे, वऱ्हाडी, चाहते आणि बाप्पाचा आशीर्वाद…सगळंच स्वप्नवत होतं. प्रेक्षकांनी आम्हाला कुटुंबासारखं प्रेम दिलं आहे आणि यापुढेही देतील याची खात्री आहे.’
काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर म्हणाली, ‘हा लग्नसोहळा फक्त मालिकेपुरता मर्यादित न रहाता तो थेट प्रेक्षकांसोबत साजरा करता आला. अविस्मरणीय अनुभव आहे हा. इतकं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.’