
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच विविध अनुभव आणि आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी जवळपास 20 वर्षांपूर्वीची एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली असून, त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
मिलिंद गवळी यांनी सांगितलं की, ते ‘सोबती’ या मराठी चित्रपटाचं शूटिंग साताऱ्यातील संगम माऊली येथे करत होते. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांच्या संगमाजवळ असलेल्या विश्वेश्वराच्या महादेव मंदिरात चित्रिकरण सुरू असताना अनेक गावकरी त्यांना भेटण्यासाठी आले होते. याचवेळी काही गावकऱ्यांनी त्यांना गावातील एका लग्नाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं.
सुरुवातीला शूटिंगमुळे लग्नाला जाणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, एका माऊलीने त्यांना त्या लग्नामागची हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. गावातील एक आंधळा मुलगा, ज्याला आई-वडील नव्हते आणि एक गतिमंद मुलगी, जिनेही आई-वडिलांना गमावलं होतं, अशा दोन निराधार जीवांचं लग्न गावकऱ्यांनी मिळून लावून देण्याचा निर्णय घेतला होता.
ही गोष्ट ऐकताच मिलिंद गवळी यांनी लग्नाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे गावकऱ्यांनाही मोठा आनंद झाला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर ते पुन्हा शूटिंगसाठी रवाना झाले. मात्र, आज इतक्या वर्षांनंतरही त्या लग्नाच्या आठवणी त्यांच्या मनात ताज्या आहेत.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘सोबती’ चित्रपटातील अनेक प्रसंग आज आठवत नाहीत, पण त्या दोन जीवांच्या लग्नाचा प्रसंग आजही मनात घर करून आहे. त्या दोघांचा संसार सुखाचा सुरू असेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
गावातील निरागसता, माणुसकी आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची भावना याबद्दल बोलताना त्यांनी शहरांमध्ये हरवलेल्या निष्पापपणाचाही उल्लेख केला. शेवटी, “जोड्या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात, ते काही खोटं नाही,” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या पोस्टने अनेक नेटकऱ्यांना भावुक केलं असून, माणुसकीचा सुंदर संदेश दिल्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.