
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध अभिनेते आणि सूत्रसंचालक Shekhar Suman तब्बल चौदा वर्षांनंतर नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांचा नवीन लेट-नाईट टॉक शो ‘Shekhar Suman Tonight’ नुकताच सुरू झाला असून, यावेळी ते यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत.
मनमोकळ्या गप्पा, मार्मिक विनोद आणि विविध विषयांवरील स्पष्ट भूमिका यासाठी ओळखल्या जाणाऱ्या Shekhar Suman यांनी या नव्या पर्वाची सुरुवात खास पाहुणे Nitin Gadkari यांच्या उपस्थितीत केली.
पहिल्याच भागात झालेल्या या खास संवादात भाषा, राजकारण, सामाजिक जबाबदारी आणि ‘विविधतेत एकता’ या विषयांवर सखोल चर्चा रंगली. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि सांस्कृतिक ओळख याविषयी बोलताना Nitin Gadkari यांनी राज्याबाहेर राहिल्यानंतर मराठी संस्कृतीचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवल्याचे सांगितले.या चर्चेमुळे शोच्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी बोलताना Nitin Gadkari यांनी मराठी अस्मितेबद्दलचा अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले, “आपल्याला मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी साहित्य आणि मराठी गाण्यांचा अभिमान आहे. अरुण आणि श्रीधर फडके यांसारख्या कवींनी मराठी संस्कृती समृद्ध केली आहे. मी महाराष्ट्राबाहेर अधिक काळ घालवू लागलो, तेव्हा मला मराठीचे खरे महत्त्व अधिक जाणवले. विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आणि सुंदरता आहे.”
दरम्यान, ‘Shekhar Suman Tonight’मधील संवादात Shekhar Suman यांनी अलीकडील मराठी भाषेवरील वादाचा उल्लेख करत हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अलीकडे असा आदेश देण्यात आल्याची चर्चा होती की ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना स्कूटर किंवा रिक्षा चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे अनेक लोक घाबरले, आणि आमच्यासारखे बिहारी लोक तर आणखीच चिंतेत पडले. कृपया आमच्या बिहाऱ्यांची काळजी घ्या.”
या वक्तव्यांमुळे शोमधील संवादाला एकाचवेळी विनोदी आणि विचारप्रवर्तक रंग मिळाला.‘Shekhar Suman Tonight’मधील संवादादरम्यान Nitin Gadkari यांनी मराठी भाषा वादावर स्पष्ट आणि संतुलित भूमिका मांडली. Shekhar Suman यांच्या वक्तव्याला उत्तर देताना ते मिश्कीलपणे म्हणाले, “तुम्हीही बिहारी आहात.”
यानंतर त्यांनी बिहारमधील विकासकामांचा उल्लेख करत सांगितले की, “बिहार राज्य स्थापन झाल्यानंतर आम्ही गंगेवर सर्वाधिक पूल आणि रस्ते बांधले आणि राज्याचे संपूर्ण चित्र बदलले. जर आम्ही बिहाऱ्यांच्या विरोधात असतो, तर हे काम कसे केले असते?”
मराठी भाषेबाबत सुरू झालेल्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, नंतर संबंधित निर्णय मागे घेण्यात आला. तसेच ते म्हणाले, “जर मला रिक्षा चालवावी लागली, तर मीही मराठी शिकेन. कारण एखादी भाषा येत नसेल, तर कामावर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक भाषेला तिच्या साहित्याचा आणि संस्कृतीचा अभिमान असायलाच हवा, पण तो अभिमान अतिरेकी किंवा हटवादी नसावा.”
राजकारणाविषयी बोलताना Nitin Gadkari यांनी स्पष्ट केले की, राजकारण हे केवळ सत्तेचे नसून तडजोडी, मर्यादा आणि विरोधाभास यांचा खेळ आहे. अनेकदा समाजातील नकारात्मक परिस्थितीसाठी केवळ राजकारणी नव्हे, तर जनतेची भूमिकाही जबाबदार असते, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “ज्या दिवशी जनता चुकीचे राजकारण करणाऱ्यांना नाकारण्याचा निर्णय घेईल, त्या दिवशी बदल सुरू होईल. लोकांनी ठाम भूमिका घेतली, तर संपूर्ण राजकीय व्यवस्था बदलू शकते.”
आपल्या तत्त्वांबद्दल बोलताना Nitin Gadkari यांनी सांगितले की, त्यांनी कधीही जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर भेदभाव केला नाही. “माझा संपूर्ण मतदारसंघ हेच माझे कुटुंब आहे आणि मी सर्वांसाठी समान काम करेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Adhyayan Suman निर्मित आणि धर्मेश सांगाणी यांच्या निर्मितीत साकारलेला ‘Shekhar Suman Tonight’ हा शो प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव घेऊन आला आहे.या कार्यक्रमातून Shekhar Suman यांची खास विनोदी शैली, प्रामाणिक संवाद आणि भावनिक सादरीकरण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. ज्याची चाहत्यांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती.
प्रभावी पाहुणे, मनाला भिडणारे संवाद आणि शेखर सुमन यांचा खास अंदाज यामुळे ‘Shekhar Suman Tonight’ हा केवळ पुनरागमन करणारा शो नसून, प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव ठरणार असल्याची चर्चा आहे.