(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Rakshabandhan 2026: रक्षाबंधन म्हटलं की भाऊ-बहिणीच्या नात्याची आठवण करून देणारी अनेक गाणी आपल्या मनात येतात. मात्र, ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ हे गाणं आजही प्रत्येक रक्षाबंधनाला आवर्जून ऐकलं जातं. या गाण्यात भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि भावनिक बंध दिसतो. विशेष म्हणजे, या अजरामर गाण्यामागे गीतकार शैलेंद्र यांच्या आयुष्यातील एक हृदयद्रावक आठवण दडलेली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांना १९५०च्या दशकात एका तमिळ चित्रपटाची कथा भावली. १९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘एन थंगई’ हा तमिळ चित्रपट भाऊ-बहिणीचं नातं, कुटुंब, विश्वासघात आणि त्याग याभोवती फिरणारा होता.
यानंतर १९५९ मध्ये एल. व्ही. प्रसाद यांनी या चित्रपटाचा हिंदी रिमेक केला. ‘छोटी बहन’ या नावाने प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बलराज साहनी आणि नंदा प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीच, पण त्यातील एका गाण्याने चित्रपटाला वेगळीच ओळख मिळवून दिली.
हे गाणं होतं ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’.
शैलेंद्रांच्या लेखणीतून उमटली मनातील वेदना
या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांनी लिहिले होते. संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी या गाण्याला संगीत दिलं, तर लता मंगेशकर यांच्या आवाजाने ते अजरामर झालं. चित्रपटात हे गाणं नंदा यांच्या व्यक्तिरेखेवर चित्रित करण्यात आलं होतं.
मात्र, या गाण्याची निर्मिती केवळ चित्रपटाच्या कथेपुरती मर्यादित नव्हती. शैलेंद्र यांच्या मुली अमला शैलेंद्र मजुमदार यांनी एका मुलाखतीत या गाण्यामागची भावनिक कहाणी सांगितली होती.
अमला यांच्या माहितीनुसार, शैलेंद्र यांनी त्यांच्या दोन बहिणींना लहानपणीच गमावलं होतं. त्यातील धाकटी बहीण कमला त्यांच्या विशेष जवळची होती. तिच्या निधनाचा शैलेंद्र यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. त्यामुळे ‘छोटी बहन’च्या कथेतील प्रसंग आणि गाण्याची परिस्थिती समोर आल्यानंतर त्यांच्या मनात बहिणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्याच भावनेतून या गाण्याचे शब्द त्यांच्या लेखणीतून उतरले.
‘शायद वो सावन भी आए…’
गाण्याच्या शेवटच्या ओळींमध्येही बहिणीच्या आठवणी आणि तिच्या दुराव्याची वेदना जाणवते.
‘शायद वो सावन भी आए, जो बहना का रंग न लाए,
बहन पराए देश बसी हो, अगर वो तुम तक पहुंच न पाए,
याद का दीपक जलाना, जलाना…’
या ओळी ऐकताना आजही अनेकांच्या डोळ्यांत पाणी येतं. कारण हे केवळ चित्रपटातील गाणं नाही, तर बहिणीपासून दुरावलेल्या भावाच्या मनातील भावना व्यक्त करणारं गीत आहे.
‘छोटी बहन’ चित्रपटात नंदाने मीना ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिचे मोठे भाऊ राजेंद्र आणि शेखर यांच्यासोबत तिचे अतूट नाते दाखवण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या प्रसंगी मीना आपल्या भावांना राखी बांधते आणि हे नातं आयुष्यभर जपण्याची विनंती करते.
चित्रपटाची कथा तीन अनाथ भावंडांच्या आयुष्याभोवती फिरते. मोठा भाऊ राजेंद्र आपल्या धाकट्या भावाची आणि बहिणीची जबाबदारी स्वीकारतो. दोघांचं आयुष्य स्थिर होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय तो घेतो.
दरम्यान, शेखरचं शोभासोबत प्रेम जुळतं. शोभा ही श्रीमंत कुटुंबातील मुलगी असते. दुसरीकडे मीनाच्या लग्नाची तयारी सुरू असते. मात्र, एका अपघातात मीनाची दृष्टी जाते आणि तिचं लग्न मोडतं. त्याच काळात शोभाच्या दबावामुळे शेखर तिच्याशी लग्न करतो आणि सासऱ्यांच्या घरी राहायला जातो.
या सगळ्या कौटुंबिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ हे गाणं येतं आणि भावंडांच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि दुराव्याची वेदना अधिक तीव्रपणे समोर येते.
आज ६०हून अधिक वर्षांनंतरही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी हे गाणं वाजलं की भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमासोबतच गीतकार शैलेंद्र यांच्या मनात दडलेली बहिणीच्या आठवणींची वेदनाही जाणवते.
राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र






