( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
The Revolutionaries: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तुलनेने कमी परिचित नायकांची कहाणी आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्राइम व्हिडिओने आपल्या बहुप्रतीक्षित हिंदी ओरिजिनल सीरिज ‘द रेव्होल्यूशनरीज’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक निखिल आडवाणी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ही हाय-ऑक्टेन पीरियड ड्रामा सीरिज ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मोनिशा आडवाणी आणि मधु भोजवानी यांनी एम्मे एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या सीरिजची निर्मिती केली आहे. सत्य घटनांपासून प्रेरित असलेली ही सीरिज भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची एक अनकही कथा सिनेमॅटिक आणि मनोरंजक पद्धतीने मांडणार आहे. ही सीरिज संजीव सान्याल यांच्या बेस्टसेलर ‘रिव्होल्यूशनरीज: द अदर स्टोरी ऑफ हाउ इंडिया वॉन इट्स फ्रीडम’ या पुस्तकावर आधारित आहे.
‘द रेव्होल्यूशनरीज’मध्ये भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांटा आणि गुरफतेह पीरझादा प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. भुवन बाम रासबिहारी बोस, रोहित सराफ सचिंद्र नाथ सान्याल, प्रतिभा रांटा प्रतिभा लाहिडी आणि गुरफतेह पीरझादा बाघा जतिन यांच्या भूमिका साकारत आहेत. याशिवाय जेसन शाह, पाओली दाम आणि टोटा रॉय चौधरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा चार निडर तरुण क्रांतिकारकांच्या धैर्याभोवती फिरते. १८५७च्या बंडानंतरच्या काळात जन्मलेले हे तरुण न्याय, स्वातंत्र्य आणि मुक्तीच्या विचारांनी प्रेरित होते. ब्रिटिश साम्राज्याच्या प्रचंड ताकदीसमोर उभे राहत त्यांनी सशस्त्र प्रतिकाराचा धोकादायक मार्ग स्वीकारला.
या प्रवासात त्यांना शौर्य, बलिदान, मैत्री आणि विश्वासघाताचा सामना करावा लागतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला आकार देणाऱ्या त्यांच्या असामान्य निर्णयांची आणि संघर्षाची कहाणी या सीरिजमधून पाहायला मिळणार आहे.
‘द रेव्होल्यूशनरीज’चा प्रीमियर ११ सप्टेंबर रोजी भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे. हिंदी भाषेतील या सीरिजचे तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांमध्ये डबिंग उपलब्ध असेल. तसेच इंग्रजीसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सबटायटल्सही असतील.
प्राइम व्हिडिओ इंडियाच्या SVOD ओरिजिनल्सचे डायरेक्टर आणि हेड निखिल माधोक म्हणाले, “भारताचा स्वातंत्र्यलढा हा मानवी इतिहासातील सर्वात असामान्य अध्यायांपैकी एक आहे. यात धैर्य आणि बलिदानाच्या अशा अनेक कथा आहेत, ज्या आजही पिढ्यान्पिढ्या प्रेरणा देतात. संजीव सान्याल यांच्या पुस्तकात अशा अनेक शानदार व्यक्तिरेखा आणि घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि त्यातील काही कथा या सीरिजसाठी पडद्यावर आणता आल्या, याचा आम्हाला अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले, “‘द रेव्होल्यूशनरीज’ ही चार शूर क्रांतिकारक आणि ब्रिटिश साम्राज्याविरोधात देशभरात सशस्त्र आंदोलन उभारण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर आधारित एक रोमांचक सीरिज आहे. सुरुवातीपासूनच हा आमच्यासाठी एक खास प्रोजेक्ट राहिला आहे. निखिल आडवाणी तसेच एम्मे एंटरटेनमेंटच्या टीमसोबत पुन्हा काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”
निखिल आडवाणी म्हणाले…
‘द रेव्होल्यूशनरीज’चे क्रिएटर आणि दिग्दर्शक निखिल आडवाणी म्हणाले, “द रेव्होल्यूशनरीजसाठी मला सर्वाधिक उत्साहित करणारी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतातील तुलनेने कमी परिचित नायकांच्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची मिळालेली संधी. संजीव सान्याल यांच्या याच नावाच्या पुस्तकात नमूद केलेल्या सत्य घटना आणि धैर्याच्या असामान्य कथांपासून प्रेरणा घेत, आम्ही ही सीरिज व्यक्तिरेखांवर आधारित अॅक्शन ड्रामा म्हणून साकारली आहे.”
ते पुढे म्हणाले, “यात बंड, बलिदान, मैत्री आणि स्वातंत्र्याची कथा भावनिक आणि सिनेमॅटिक अंदाजात मांडण्यात आली आहे. प्राइम व्हिडिओसोबत आमचे दीर्घकाळापासून शानदार नाते आहे आणि या टीमसोबत पुन्हा काम करून या कथेची योग्य भव्यता आणि सर्जनशीलता पडद्यावर आणणे हा एक शानदार अनुभव होता.”
निर्माते मधु भोजवानी आणि मोनिशा आडवाणी यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं, “‘द रेव्होल्यूशनरीज’ आमच्यासाठी केवळ एक सीरिज नाही. जेव्हा आम्ही पहिल्यांदा या असामान्य कथांबद्दल जाणून घेतले, तेव्हापासूनच ही कथा आमच्या मनाच्या खूप जवळची राहिली आहे.”
“एवढ्या मोठ्या स्तरावर आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या प्रोजेक्टला पडद्यावर साकारण्यासाठी जितकी मनोरंजक तितकीच धाडसी कथा तयार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे समर्पित राहणे आवश्यक होते. निखिल यांनी एक कथाकार म्हणून जे साध्य केले आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या कलाकार आणि तंत्रज्ञ टीमनेही पूर्ण समर्पणाने प्रत्येक दृश्यात आपले सर्वोत्तम दिले,” असंही त्यांनी सांगितलं.
‘द रेव्होल्यूशनरीज’ ही सीरिज स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काही कमी परिचित पण धाडसी नायकांची कहाणी नव्या पिढीसमोर आणणार आहे. त्यामुळे इतिहास, अॅक्शन आणि भावनिक कथानकाचा संगम असलेल्या या सीरिजकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.





