
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला, ज्याने सोशल मीडियावर अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे. लोकांना चित्रपटाचा टीझर खूप आवडला असून, सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. दरम्यान, श्रद्धा कपूरने साकारलेली विठ्ठाबाई नारायणगावकर ही व्यक्तिरेखा नेमकी कोण होती, यावर चर्चा सुरू आहे.
कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?
विठाबाई नारायणगावकर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचा जन्म १ जुलै १९३५ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर गावात झाला. त्यांचे आजोबा, नारायण खुदे यांनी एक कला पथक स्थापन केले होते आणि नंतर विठाबाईंच्या वडिलांनी ते पथक चालवले. विठाबाईंना लहानपणापासूनच लावणीची आवड होती आणि वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी शाळा सोडली.
विठाबाईंनी वडिलांच्या लावणी पथकासोबत दौरे सुरू केले आणि कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता, निरीक्षणातून गायन, नृत्य आणि अभिनय शिकून घेतला. १९४८ मध्ये, वयाच्या १३ व्या वर्षी, त्यांनी स्वतःचे लावणी पथक सुरू केले आणि अल्पावधीतच लोकांची मने जिंकली.
वडिलांना दिलेले वचन आयुष्यभर पाळले
१९५७ साली जेव्हा विठाबाई नारायणगावकर यांच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी वडिलांना वचन दिले होते की त्या लावणी कधीही सोडणार नाहीत आणि लोकांचे नेहमीच मनोरंजन करत राहतील. त्यांनी हे वचन शेवटपर्यंत पाळले. इतकेच नव्हे तर, एकदा रंगमंचावर कार्यक्रम सादर करत असताना विठाबाईंना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या.
कानावर पडताच पाय थिरकतील! ‘भूतम भयम’च्या ‘गोमु सासरला जाते’ ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
प्रसूतीनंतर पुन्हा रंगमंचावर!
विठाबाई जराही न डगमगता, एकही शब्द न बोलता शांतपणे रंगमंचामागे गेल्या. तिथे त्यांनी एका मुलीला जन्म दिला, दगडाने स्वतःची नाळ कापली आणि पुन्हा रंगमंचावर नाचायला परतल्या. विठाबाई बाळंतपणानंतर नुकत्याच रंगमंचावर परतल्या आहेत हे जेव्हा प्रेक्षकांना कळले, तेव्हा ते भावनाविवश झाले आणि त्यांनी कार्यक्रम थांबवला.
‘ईठा’मधून उलगडणार जीवनगाथा
श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या चित्रपटातून विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्ष, कलेवरील प्रेम, त्याग आणि यशाची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तमाशा आणि लावणी क्षेत्रात अमिट ठसा उमटवणाऱ्या या कलावंतीणीचा प्रवास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम हा चित्रपट करणार आहे.
विठाबाई नारायणगावकर या केवळ एक कलाकार नव्हत्या, तर जिद्द, समर्पण आणि लोककलेवरील निस्सीम प्रेमाचे प्रतीक होत्या. त्यामुळेच त्यांना आजही ‘तमाशासम्राज्ञी’ म्हणून आदराने स्मरण केले जाते.