
इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू (Pema Khandu) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे 2 तसेच नॅशनल पीपल्स पार्टीच्या 2 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग व वांगलिंन लाऊनदोंग भाजपमध्ये सहभागी झाले आहे.
नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार मुचू मिथी, गोकर बासर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता 60 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेस तसेच नॅशनल पीपल्स पार्टीकडे प्रत्येकी 1-1 आमदार उरलेत.
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे संख्याबळ 56 वर
60 सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी चार आमदारांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्य विधानसभेतील एकूण 60 सदस्यांपैकी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे संख्याबळ 56 पर्यंत वाढले, तर काँग्रेसचे दोन कमी झाले. सभागृहात दोन अपक्ष सदस्यही आहेत.
राज्यात आमचा पाया मजबूत होईल
चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणाले, “या 4 आमदारांनी पक्षात प्रवेश करणे हे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाचा पुरावा आहे. पंतप्रधानांचे परिवर्तनवादी नेतृत्व म्हणजे ‘सबका साथ,’ ‘सबका विकास, सबका’ ‘विश्वास, सबका प्रयास’ या ब्रीदवाक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्याने देशभरात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या संबंधित मतदारसंघात आणि अरुणाचल प्रदेशात आमचा पाया आणखी मजबूत होईल.