
रेल्वेला उशीर झाल्याने विमान चुकले; प्रवाशाची थेट कोर्टातच धाव, 1.3 लाखाच्या नुकसानभरपाईचे आदेश
गुवाहाटी : रेल्वेला उशीर झाल्याने विमान चुकल्याच्या प्रकरणामध्ये ओडिशातील एका ग्राहक न्यायालयाने भारतीय रेल्वेला एका व्यक्तीला १.३ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना ओडिशाच्या बालांगीर जिल्ह्यात घडली.
चंडी प्रसाद खमारी नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती की, २०२४ मध्ये त्यांच्या रेल्वेला सुमारे सात तासांचा उशीर झाला होता. या विलंबामुळे त्यांना त्यांचे आधीच आरक्षित केलेले विमान पकडता आले नाही. खमारी यांनी २३ ऑगस्ट २०२४ रोजी झारसुगुडा ते हावडा या प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट खरेदी केले होते. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, ही गाडी सायंकाळी ७:५० वाजता झारसुगुडा येथून निघून पहाटे ३:५५ वाजता हावडा येथे पोहोचणे अपेक्षित होते. सर्व वेळापत्रकावर आधारित खमारी यांनी गुवाहाटीसाठी विमानाचे तिकीट आरक्षित केले होते, ज्याचे उड्डाण सकाळी ८:०५ वाजता होणार होते.
दरम्यान, रेल्वेच्या नियोजित आगमनाची वेळ आणि विमानाचे उड्डाण यांमध्ये त्यांनी जवळपास चार तासांचा पुरेसा अवधी ठेवला होता. ही रेल्वे झारसुगुडा येथूनच दोन तासांच्या विलंबाने निघाली आणि अखेरीस नियोजित वेळेपेक्षा सुमारे सात तास उशिराने कोलकाता येथे पोहोचली. परिणामी, त्यांचे विमान चुकले. खमारी यांनी सांगितले की, त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना त्यांचे विमानाचे तिकीट रद्द करण्यास भाग पडले, ज्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले,.
रेल्वेचा काय युक्तिवाद?
आपल्या बचावासाठी, रेल्वे प्रशासनाने असा युक्तिवाद केला की, रेल्वे वेळेवरच धावेल याची कोणतीही हमी देता येत नाही. अनेक प्रसंगी होणाऱ्या विलंबाचे कारण म्हणून त्यांनी परिचालनविषयक कारणे पुढे केली. प्रवासाची संपूर्ण जबाबदारी केवळ त्यांच्यावरच नसते; त्यामुळे, त्यांना पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही. मात्र, ग्राहक न्यायालयाने रेल्वेने मांडलेला हा युक्तिवाद फेटाळून लावला.
समर स्पेशल ट्रेन धावणार
दुसरीकडे, उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. असे असले तरी यामध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे विभागातून एकूण ५७७ समर स्पेशल फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी तब्बल ५२३ फेऱ्या परराज्यांसाठी आहेत. राज्यांतर्गत प्रवासासाठी मात्र केवळ ५४ फेऱ्या ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.