दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीवारी केली. निवडणूकीपूर्वीची त्यांची ही वारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत मला तडीपार करणार असल्याचा दावा केला होता. यावर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, “आमचे खूप हितचिंतक आहेत. ते हितचिंतक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन काहीतरी सांगत असतात. त्यावर जरांगे पाटील बोलतात. असं कुणालाही तडीपार केले जात नाही. तडीपार करण्यासारखे त्यांच्यावर खटले दाखल आहेत का? तर तसे अजिबात नाही. अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे काम करत असतात. अशी लोक जरांगे पाटील यांना काहीतरी सांगत असतात. जरांगे पाटील आणि आंदोलकांवर ज्या केसेस दाखल आहेत, त्या मागे घेतल्या जाणार आहेत,” असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Media Interaction at New Delhi..
नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद..#BJP #Maharashtra #NewDelhi #LokSabha #PhirEkBaarModiSarkar pic.twitter.com/uMomvZZntk — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 23, 2024
पुढे ते म्हणाले, “ज्याठिकाणी जाळपोळ, तोडफोड झाली, पोलिसांवर हल्ला झालेला आहे, अशा केसेस परत घेणे शक्य होणार नाही. मात्र इतर केसेस परत घेण्याची घोषणा करून त्यावर कामही सुरू केले आहे. सध्या २४ जिल्ह्यांमध्ये तपासावर असलेल्या एकूण ४९२ केसेस आहेत. त्याची छाननी सुरू झाली आहे. १७२ केसेस परत घेण्यासंदर्भात शिफारसही दिली आहे. सहा केसेस मागे घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. उर्वरित केसेसची छाननी सुरू आहे. केसेस मागे घेण्यासाठी संबंधित लोकांना जबाबासाठी पुन्हा बोलवावे लागते. त्याची एक कायदेशीर प्रक्रिया असून ती पूर्ण करावीच लागते. पण जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावले तरी नवीन केस दाखल झाली, असे सांगितले जाते. मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
उद्धव ठाकरे हे टोमणे बहाद्दर
ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी त्यांना टोमणे बहाद्दर ही उपमा दिली आहे. माझी उपमा कशी सार्थ ठरेल, याचा आटोकाट प्रयत्न ते करत असतात. फडणवीसांनी उपमा दिली आहे तर ती सार्थच ठरविली पाहीजे, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते टोमणे मारत असतात. काहीतरी बोलत असतात. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एक वाक्य विकासावर बोलून दाखवावे. सामान्य माणसाच्या आयुष्यात तुम्ही काय बदल करणार आहात किंवा केला आहे? याबद्दल सांगण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी जहरी टीका केली.






