Delhi Riots Case: उमर खालिद आणि शरजील इमामला पुन्हा मोठा धक्का; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
Delhi Riots Case : दिल्ली २०२० च्या दंगल प्रकरणातील कथित कटातील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्जावर आज करकरडूमा न्यायालयात सुनावणी पार पडली. पण यावेळीदेखील न्यायालयाने उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय राखून ठेवला होता. सायंकाळी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर बाजपेयी यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन नाकारला. उमरच्या वतीने वकील त्रिदीप पैस आणि शरजीलच्या वतीने वकील मुस्तफा यांनी युक्तिवाद सादर केला.
उमर खालिद आणि शरजील इमाम यांनी त्यांच्या जामीन अर्जात असा युक्तिवाद केला की, खटल्याची सुनावणी सुरू न होताच आम्हाला दीर्घकाळापासून कारागृहात ठेवण्यात आले आहे, हे आमच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी आमचे जामीन अर्ज फेटाळले असले, तरी त्यानंतरच्या न्यायालयीन घडामोडींमुळे परिस्थितीत बदल आले आहेत, असा दावा त्यांनी केला.
दोघांनीही मे महिन्यातील एका स्वतंत्र प्रकरणातील न्यायालयाच्या निरीक्षणाचा दाखला देत, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गतही जामीन हा अपवाद नव्हे, तर नियम असावा, असे न्यायालयाने नमूद केल्याचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाने ५ जानेवारी रोजी जामीन नाकारल्यानंतर त्यांनी नव्याने हे अर्ज दाखल केले होते.
उमर आणि शरजील यांच्या या युक्तिवादांना विरोध करत दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडून वेगळा आदेश येत नाही, तोपर्यंत विद्यमान आदेश लागू राहील. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसून, कोणताही दिलासा किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास आरोपींनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी.
दरम्यान, न्यायालयाने १३ जून रोजी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आरोपींनी नव्याने जामीन अर्ज दाखल करत दावा केला की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून सहा महिने उलटल्यानंतरही त्यांच्या खटल्याच्या सुनावणीत कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही. तसेच त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यावरील युक्तिवादही अद्याप पूर्ण झालेला नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.
५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद आणि शरजील इमाम यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. मात्र, त्याच दिवशी गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा-उर-रहमान, शादाब अहमद आणि मोहम्मद सलीम खान यांचे जामीन मंजूर करण्यात आले. त्यानंतर २२ मे रोजी खालिद सैफी आणि तस्लीम अहमद यांनाही सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केले.
फेब्रुवारी २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीमागील कथित मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप ठेवत उमर खालिद, शरजील इमाम आणि इतर अनेकांविरुद्ध यूएपीए तसेच भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकत्व (सुधारणा) कायदा (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनादरम्यान उसळलेल्या या हिंसाचारात ५३ जणांचा मृत्यू, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.






