
नवी दिल्ली : भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. विविध राज्यांतील उमेदवारांची निवड आणि निवडणुकीच्या मुद्यावर सर्व पक्षांमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत. पण त्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांची नाराजी स्पष्टपणे दिसत होती.
केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार, जयपूरमध्ये राजस्थान भाजपची बैठकही झाली. मात्र, त्यात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. या बैठकीला विद्यमान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
यात राज्याचे प्रभारी अरुण सिंह, ज्येष्ठ नेते ओम माथुर, केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, अशोक पर्नामी, अरुण चतुर्वेदी, माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड आणि उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा उपस्थित होते. मात्र, माजी मुख्यमंत्री उपस्थित न राहल्याने अनेक अटकळांना बळ मिळाले आहे. वसुंधरा राजे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होत्या.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर वसुंधरा राजे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी मोर्चेबांधीणी केली होती. दिल्लीत जाऊन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. तसेच निवडणुकीदरम्यान त्यांना फारसे महत्व देण्यात आले नाही. त्यामुळे राजे नाराज असल्याची चर्चा आहे.