
विमान येण्यापूर्वीच दुपारी २:४५ वाजता राजकोट विमानतळावर ‘पूर्ण आणीबाणी’ जाहीर करण्यात आली. धावपट्टीवर अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी ३:२७ वाजता विमान सुरक्षितपणे उतरले. सर्व १९४ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. प्रवासी सुरक्षितपणे खाली उतरल्यानंतर आणीबाणीची स्थिती मागे घेण्यात आली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्गो होल्डमध्ये धुराचे संकेत मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमान राजकोटमध्ये उतरवण्यात आले. धुराच्या इशाऱ्याचे नेमके कारण शोधण्यासाठी आता विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी केली जाईल. या घटनेनंतर इंडिगोने निवेदन जारी करून दुजोरा दिला की, तांत्रिक बिघाडामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 6E-1452 (दुबई-मुंबई) या विमानाचा मार्ग बदलून ते राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले होते. विमान कंपनीने सांगितले की, विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानाची तपासणी सुरू आहे आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा उड्डाणासाठी वापरले जाईल. प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, प्रवाशांना शक्य ती सर्व मदत आणि आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत.
या घटनेमुळे प्रवाशांची झालेली गैरसोय त्याबद्दल खेद व्यक्त करत, इंडिगोने स्पष्ट केले की प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांनुसार, विमानातील मालवाहू कक्षात (कार्गो होल्ड) धूर किंवा आग दिसणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते; कारण प्रत्यक्ष आग लागल्यास विमानासुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तातडीने आग विझवण्याची किंवा आगीवर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया सुरू करणे, आवश्यक असल्यास आणीबाणीची घोषणा करणे आणि विमान सर्वात जवळच्या योग्य विमानतळावर उतरवणे, याचे प्रशिक्षण विमान कर्मचाऱ्यांना दिलेले असते.
तथापि, धूर आढळल्याचा इशारा मिळणे म्हणजे विमानात प्रत्यक्ष आग लागलीच आहे असे नाही; तांत्रिक आणि सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतरच याची खात्री करता येते. धूर आढळण्यामागचे नेमके कारण अद्याप संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले नाही, तसेच विमानाच्या नुकसानीबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, ‘इंडिगो’ ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी असून ती ८० हून अधिक देशांतर्गत आणि ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी विमानसेवा चालवते. या कंपनीच्या ताफ्यात प्रामुख्याने एअरबस A320 आणि A321 श्रेणीतील विमाने, तसेच प्रादेशिक मार्गांसाठी ATR 72-600 विमानांचा समावेश आहे.