ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही. अनंत नागेश्वरन यांनी ‘ई-२०’ पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी जुन्या दुचाकी वाहनांसाठी पुन्हा ‘ई-१०’ पेट्रोलची विक्री सुरू ठेवण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात स्पष्ट केले होते की, ई-२० पेट्रोलमुळे वाहनांच्या प्रकारानुसार आणि वयानुसार इंधनाचे मायलेज २ ते ६ टक्क्यांनी कमी होऊ शकते.
सरकारचा असा दावा आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवल्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी घट झाली असून, देशाची अब्जावधी रुपयांची बचत झाली आहे. मात्र, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या मते, सध्या देशात सुमारे ८ कोटी जुन्या बाईक्स आणि स्कूटर्स आहेत, ज्या जुन्या कार्बोरेटर तंत्रज्ञानावर चालतात. हे कार्बोरेटर बीएस-४ इंजिन नियम लागू होण्यापूर्वी तयार करण्यात आले होते. आता सरकारने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळणे सुरू केले आहे.
मोठी अडचण अशी आहे की, या जुन्या कार्बोरेटर असलेल्या गाड्या ई-२० पेट्रोलवर व्यवस्थित चालू शकत नाहीत. इथेनॉलमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. जुन्या गाड्या हवा आणि पेट्रोलच्या या नवीन मिश्रणाला आपोआप अॅडजस्ट करू शकत नाहीत, ज्यामुळे इंजिन लवकर आणि जास्त प्रमाणात तापू लागते. एवढेच नाही तर ई-२० पेट्रोलच्या वापरामुळे वाहनातील रबरी पाईप्स आणि अंतर्गत भाग हळूहळू वितळण्याचा किंवा होण्याचा धोका निर्माण होतो.
जनता आणि सरकार यांच्यातील तापलेला मुद्दा
ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी मिसळले जात असल्याच्या वृत्तांमुळे जनतेने सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण जेव्हा इंधनात पाणी आणि क्लोराईड मिसळले जाते, तेव्हा ते वाहनासाठी हानिकारक असते, कारण त्यामुळे इंधन पंप आणि इंजिनच्या भागांमध्ये गंज चढू शकतो. यामुळेच सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून थेट चौकशी केली आहे.