नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. तसेच एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी खाद्यतेलाच्या दरात कपात करुन केंद्र सरकार ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. खाद्यान्न, डाळी, अन्नधान्य, मसाले आणि इतर अनेक पदार्थ महागल्याने स्वयंपाकघराचे बजेट पार कोलमडून गेले आहे.
केंद्र सरकार या कोलडमडेल्या बजेटला थोडा दिलासा देण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना एक पत्र लिहिले आहे. सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाला जागतिक स्तरावरील किंमती आधारे खाद्यतेलाच्या भावात कपातीचे निर्देश देण्यात आले आहे.
खाद्यतेल व्यवसायामधील तज्ज्ञांच्या मते, यावेळी खाद्यतेलाच्या किंमतीत एकदमच कपात करणे शक्य नाही. पण टप्याटप्याने हा निर्णय अंमलबजावणीत येईल. मार्च महिन्यापर्यंत खाद्यतेलाच्या किंमतीत कपातीचा शक्यता आहे. देशात मोहरीचे उत्पादन आता हाती येईल. त्यानंतर नवीन तेलाचा बाजारात पुरवठा होईल. तोपर्यंत किंमतीत कपात करणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात याविषयीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महागाईवर नजर
केंद्र सरकार गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किमती वाढू नये, यासाठी कसोशीने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून खाद्यतेलाच्या किमती भडकू न देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. त्यासाठी अनेक उपाय पण करण्यात आले आहे.