
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. येथील १४ पैकी तीन जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा पहिला मोठा विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश येथील याचुली, लेकांग आणि बोरदुम्सा-दियुन मतदारसंघातून टोको ताताउंग, लिखा सोनी आणि निख कामिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाला मिळालेले हे पहिलेच निवडणूक यश आहे. दरम्यान, आता अजित पवार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहेत.
निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या अजित पवार यांच्या गटाला खरा राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अरुणाचल प्रदेशात दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्यात यश आले आहे. २००९ मध्ये ३६ पैकी ५ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. २०१४ मध्ये त्यांनी ९ जागा लढवल्या होत्या, पण त्यांना खातेही उघडता आले नव्हते. २०१९ मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने निवडणूक लढवली नव्हती.
अजित पवार यांची प्रतिक्रीया
अजित पवार म्हणाले, अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो.
पुढे अजित पवार म्हणाले, विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या 10.06 टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो.