
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा ठप्प
लखनौ : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उन्हाचा कडाका बसत असतानाच आता काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण वादळ आणि पावसामुळे हाहा:कार उडाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. ग्रामीण भागात मातीची घरे आणि पत्र्याची शेड उडून गेली, तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले.
मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे अनेक भागांतील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. याच वादळामुळे विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 62 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये भदोहीमध्ये ११, मिर्झापूरमध्ये सहा, सीतापूरमध्ये दोन, कानपूर विभागात १४, प्रयागराजमध्ये नऊ, प्रतापगडमध्ये चार, रायबरेलीमध्ये दोन, संभलमध्ये दोन आणि बरेलीमध्ये १४ जणांचा समावेश आहे. प्रशासनाने बाधित भागांमध्ये मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. नुकसानीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा दिला असून, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील बांदा हे सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे. याठिकाणी ४५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. वादळ आणि पावसामुळे राज्यात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, बुंदेलखंडसह दक्षिणेकडील जिल्ह्यांमधील कडक ऊन आणि तीव्र उष्णतेमुळे लोक त्रस्त झाले होते. ४५.४ अंश सेल्सिअस तापमानासह बांदा हे राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंदवले गेले.
राज्याच्या इतर भागांत उष्णतेत वाढ
दुसरीकडे, झाशीमध्ये ४४.५ अंश सेल्सिअस, प्रयागराजमध्ये ४३.५ अंश सेल्सिअस, हमीरपूरमध्ये ४३.२ अंश सेल्सिअस आणि ओराईमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लखनौ येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अतुल कुमार सिंह यांच्या मते, गुरुवारपासून तापमानात हळूहळू वाढ होईल. १६ मे पासून बुंदेलखंड आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणि उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा