Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला 'हा' इशारा (फोटो - istcok)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उन्हाचा कडाका वाढत असतानाच मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते सहा दिवस आधी देशात दाखल होऊ शकतो. साधारणपणे, 1 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून पोहोचतो, पण यावेळी तो 25 ते 27 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात एक प्रणाली तयार झाली आहे, जी पुढील ४८ तासांत अधिक तीव्र होऊ शकते. यामुळे अनेक दक्षिण भारतीय राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल. हवामान विभागाच्या अंदादानुसार, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तरेकडे सरकून नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. ही प्रणाली पुढे मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकू शकते. यामुळे विषुववृत्तावरून येणारे बाष्पयुक्त वारे अधिक तीव्र होतील. नैऋत्येकडील वाऱ्यांचा परिणाम अंदमान आणि निकोबार बेटांच्या मोठ्या भागावर होईल.
IMD Rain Alert : ‘या’ राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर सुमारे १६ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे २० मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्रात प्रवेश करतो आणि २२ मे पर्यंत पोर्ट ब्लेअर व उत्तर अंदमान समुद्रात पोहोचतो. मान्सूनला केरळममध्ये पोहोचायला साधारणपणे १० ते १२ दिवस लागतात आणि त्याच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून असते. यावेळी तो नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी अंदमान समुद्रात पोहोचण्याची शक्यता असून, २५ ते २७ मे दरम्यान केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
एक आठवडा आधी मान्सूनचे आगमन
गेल्या वर्षी, मान्सून १३ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला होता आणि २४ मे पर्यंत केरळममध्ये पोहोचला होता. याचा अर्थ, मान्सून दोन्ही प्रदेशांमध्ये सामान्य वेळेपेक्षा सुमारे एक आठवडा आधी दाखल झाला.
हवामान विभागाचा महत्त्वपूर्ण इशारा
हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये वादळ आणि पावसामुळे पाच घरांची आणि सात गोशाळांची छपरे उडून गेली. हवामान विभागाने बुधवारी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांसाठी वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला. बिहार आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या ३८ जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.






