दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण (File Photo)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरचा पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील प्रस्तावित हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या कॉरिडॉरमुळे दिल्लीपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रमुख शहरांची कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान होणार असून, दिल्ली-पाटणा हे सुमारे ११७० किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेचार तासांत पार करता येणार आहे.
सध्या रेल्वेने हे अंतर कापण्यासाठी सुमारे १२ तास लागतात. रेल्वेमंत्र्यांनी नेपाळगंज रोड-नानपारा-बहराइच मार्गावरील नव्याने विद्युतीकरण झालेल्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या उद्घाटनावेळी प्रस्तावित हायस्पीड रेल्वे नेटवर्कचा उल्लेख केला. मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरनंतर दिल्लीला आग्रा, कानपूर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि पाटणा या शहरांना जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कच्या कामाला वेग दिला जाईल.
प्रस्तावित हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची रचना ताशी ३२० किलोमीटरपर्यंतच्या परिचालन वेगासाठी केली जात आहे. त्या तुलनेत वंदेभारत रेल्वेची डिझाइन स्पीड ताशी सुमारे १८० किलोमीटर आहे. हायस्पीड रेल्वेच्या अधिक वेगामुळे दिल्ली ते बिहार या लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होण्याची अपेक्षा आहे.
अनेक प्रीमियम रेल्वे सेवा सुरू
सध्या या मार्गावर राजधानी, वंदे भारत आणि दुरंतो यांसारख्या प्रीमियम रेल्वे सेवा सुरू आहेत. हायस्पीड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेश-बिहारमधील प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
अनेक शहरांचा प्रवासाचा वेळ वाचणार
प्रस्तावित कॉरिडॉरअंतर्गत दिल्ली ते आग्रा हे सुमारे २०० किलोमीटरचे अंतर केवळ ५८ मिनिटांत पार करता येणार आहे. दिल्ली-कानपूरमधील सुमारे ४५५ किलोमीटरचा प्रवास सुमारे १ तास ५० मिनिटांत; तर दिल्ली-लखनौमधील सुमारे ४९५ किलोमीटरचे अंतर २ तास १२ मिनिटांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे दिल्ली ते प्रयागराज हे सुमारे ७५० किलोमीटरचे अंतर ३ तासांत, दिल्ली-वाराणसीचे सुमारे ९४५ किलोमीटर अंतर ३ तास ३३ मिनिटांत, तर दिल्ली-पाटणा हे सुमारे १,१७० किलोमीटरचे अंतर साडेचार तासांत पार करता येणार आहे.






