नवी दिल्ली – २००२ साली असामाजिक तत्वांना धडा शिकवल्यामुळे गुजरातमध्ये शांतता नांदत असल्याचे वादग्रस्त विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे बोलताना केले. ते म्हणाले – गुजरातमध्ये पूर्वी असामाजिक तत्व हिंसाचारात लिप्त होते. काँग्रेसचे त्यांना पाठबळ होते. पण २००२ मध्ये धडा शिकवल्यानंतर गुन्हेगारांनी आपल्या कारवाया बंद केल्या. भाजपने राज्यात स्थायी शांतता प्रस्थापित केली.
गुजरातमध्ये फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांड घडले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात जातीय दंगल उसळली होती. त्यात विविध समाजाच्या शेकडो जणांचा बळी गेला होता.
शहा म्हणाले -“गुजरातमध्ये २००२ मध्ये दंगल झाली. कारण, गुन्हेगारांना प्रदिर्घ काळापर्यंत काँग्रेसचे समर्थन मिळाल्यामुळे त्यांना हिंसाचाराची सवय झाली होती. पण २००२ मध्ये त्यांना धडा शिकवल्यानंतर अशा तत्वांनी हिंसेचा मार्ग सोडला. ते लोक २००२ पासून २०२२ पर्यंत हिंसाचारापासून दूर आहेत.” भाजपने जातीय हिंसाचारात सहभागी लोकांवर कठोर कारवाई करून गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.