संग्रहित फोटो
मुंबई : काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २४ ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत हे शिबिर असणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्व प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षण शिबिरात आगामी काळातील काँग्रेस पक्षाची दृष्टी आणि दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, काँग्रेसची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही संवादात महत्त्व दिले जाणार आहे. राज्य आणि देशपातळीवरील विविध क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक आणि तज्ञ या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष खासदार शशिकांत सेंथिल तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत. सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील AICC प्रशिक्षण टीम प्रशिक्षणाची धुरा सांभाळणार आहे.
‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या व्यापक दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाची रचना करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करताना जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, संघटनात्मक कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वक्षमता या चारही बाबी विकसित करण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणातून केला जाणार आहे. प्रशिक्षणार्थी दररोज श्रमदानात सहभागी होतील, ग्रामीण भागातील वास्तव समजून घेण्यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात येणार आहे. श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावरही या प्रशिक्षणात भर देण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.



