रेल्वेतून आता विनातिकीट प्रवास करू नकाच; दंडाच्या रकमेत झाली भलीमोठी वाढ
नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करताना तिकीट न काढताच प्रवास करणारे अनेक प्रवासी असतील. पण, आता विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पूर्वीच्या दंडाच्या दुप्पट दंड भरावा लागेल. रेल्वे मंत्रालयाने तिकिटाशिवाय प्रवास करण्याचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवला आहे. दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणेदेखील प्रवाशांसाठी देशभरातील सर्व रेल्वे झोनना नवीन नियमांची माहिती देणारा आदेश जारी केला आहे. हे नियम १ जुलै २०२६ पासून लागू होतील.
रेल्वेने इतर अनेक प्रकरणांमध्येही दंड वाढवला असून, वारंवार गुन्हा करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. ट्रेनमध्ये किंवा रेल्वे परिसरात नशेत असताना प्रवाशांना त्रास देणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या किंवा गोंधळ घालणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. अशा व्यक्तींना ट्रेनमधून उतरवले जाऊ शकते आणि दंड आकारला जाऊ शकतो किंवा इतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. रेल्वेने ट्रेनमध्ये आणि स्टेशन परिसरात भीक मागण्याविरोधातही आपल्या कारवाईचे उपाय अधिक कडक केले आहेत.
सर्व विभागांना सूचना जारी
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (प्रवासी विपणन) शिवेंद्र शुक्ला यांनी सर्व विभागीय रेल्वेला नवीन नियमांविषयीची माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, नियम लागू झाल्यानंतर त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली पाहिजे. जुन्या तरतुदींच्या आधारे कोणत्याही स्तरावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये.
…हा एक चांगला निर्णय
रेल्वे मंत्रालयाच्या मते, हे बदल तिकीटविरहित प्रवास, तिकिटांचा गैरवापर आणि रेल्वे परिसरातील इतर उल्लंघनांना आळा घालण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत, जेणेकरून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि संघटित प्रवासाचा अनुभव मिळेल. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) अमित सुदर्शन यांनी सांगितले की, हा एक चांगला निर्णय आहे, ज्यामुळे तिकीट असलेल्या प्रवाशांना फायदा होईल आणि त्यांचा प्रवास आरामदायी व सुरक्षित होईल.
रेल्वेला दरवर्षी कोट्यवधीचे नुकसान
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, विनातिकिट प्रवासामुळे भारतीय रेल्वेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होते. त्यामुळे या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सरकार आणि रेल्वे प्रशासनाने दंडात्मक तरतुदी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास पडणार महागात
दुसऱ्याच्या नावाने बुक केलेल्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वेने आपली कारवाई अधिक कडक केली आहे. अशा प्रकरणांमध्ये तिकीट जप्त केले जाईल. प्रवाशाला पूर्ण भाडे आणि किमान ५०० रुपयांचा अतिरिक्त शुल्क भरावा लागेल. जर प्रवासी पैसे भरण्यास अयशस्वी ठरला, तर हे प्रकरण न्यायालयात नेले जाऊ शकते.
‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा; अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरणीची टांगती तलवार






