File Photo : Rain
नवी दिल्ली : सध्या कधी पाऊस तर कधी उन्ह असं चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पण याच पावसाच्या (Rain Update) प्रतिक्षेत असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, निकोबार बेटांवर रविवारी (दि.19) मान्सूनने धडक दिली आहे. तर येत्या 31 मेपर्यंत केरळमध्ये मान्सून बरसेल तर महाराष्ट्रात 6 ते 10 जूनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.
सध्याचे पोषक हवामान पाहता 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये तर 6 ते 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ‘ला नीना’च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत असल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
दक्षिण कोकणात 5 जून रोजी मान्सून दाखल होईल तर विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 जूनपूर्वी मान्सून प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने हजेरी लावली.






