
PM Narendra Modi (Photo Credit- X)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. भारतही यापासून अलिप्त राहिलेला नाही. भारताकडे स्वतःचे मोठे तेलसाठे किंवा विहिरी नाहीत. आपल्याला आपल्या गरजेचा बहुतांश पेट्रोल, डिझेल आणि गॅस साठा परदेशातून आयात करावा लागतो. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधन आणि खतांचे दर गगनाला भिडले असून, याचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे.
हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोना काळातील अनुभवांची आठवण करून दिली. ते म्हणाले, “कोरोना संकटकाळात आपण ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाईन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करण्याची नवी पद्धत विकसित केली होती. आजच्या वेळेची गरज लक्षात घेता, त्याच व्यवस्थांचा पुन्हा वापर करणे देशहिताचे ठरेल. जर आपण या डिजिटल माध्यमांना प्राधान्य दिले, तर अनावश्यक प्रवासाला आळा बसेल आणि इंधन बचतीला मदत होईल.”
देशाच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी परकीय चलन वाचवण्यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला. “जगभरात पेट्रोल-डिझेल अत्यंत महाग झाले आहे. आपण जितकी इंधनाची बचत करू, तितकेच मौल्यवान परकीय चलन वाचवू शकू. हे केवळ आर्थिक गणित नसून, प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे,” असेही ते म्हणाले. इंधन आयातीवर होणारा खर्च कमी झाल्यास तो पैसा देशाच्या इतर विकासकामांसाठी वापरता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत सध्या ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’वर स्वार असून आधुनिक पायाभूत सुविधांचे जाळे वेगाने विणले जात आहे. केंद्र सरकार सर्वसामान्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी तेलंगणातील जनतेला विकासाची खात्री दिली. केंद्राच्या योजनांचा वेग अधिक वाढवून राज्याचा कायापालट करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.