
रायबरेली येथील बछरावा विधानसभा मतदारसंघातील ‘ठकुराईन खेडा’ गावात खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या बारातघरचे (मंगल कार्यालय) उद्घाटन राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी देशातील सद्य आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. “देशातील नागरिक सध्या प्रचंड आर्थिक दडपणाखाली आहेत, मात्र सरकार जनतेच्या या समस्या गांभीर्याने घेत नाहीये,” असा आरोप त्यांनी केला.
भविष्यातील आर्थिक आव्हानांबद्दल इशारा देताना राहुल गांधी म्हणाले, “येणारा काळ आर्थिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक असू शकतो. याचा सर्वाधिक आणि थेट फटका शेतकरी, तरुण, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांना बसणार आहे. सध्याच्या धोरणांमुळे कष्टकरी वर्गाची आर्थिक स्थिती कमकुवत होत चालली असून सरकारने त्यांना तातडीने दिलासा देणारे निर्णय घेण्याची गरज आहे.” तसेच, रायबरेलीच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“मोदीजी, देश तुम्हाला प्रश्न विचारतोय,” NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी आक्रमक
रायबरेलीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी प्रसिद्ध चुरुवा मंदिरात जाऊन संकटमोचन बजरंगबलीचे दर्शन घेतले. ‘बडा मंगळवार’ (Bada Mangal) असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. राहुल गांधी यांनी मंदिरात उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
तत्पूर्वी, मंगळवारी सकाळी राहुल गांधी यांचे लखनऊ येथील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तिथे उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय आणि ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर ते रस्ते मार्गाने रायबरेलीकडे रवाना झाले.
आपल्या या दोन दिवसीय दौऱ्यात राहुल गांधी जनसंवाद, महिला संवाद आणि काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक बैठकांमध्ये भाग घेणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळातील राजकीय रणनीती आणि उत्तर प्रदेशात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने राहुल गांधींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.