जगदीप धनखड यांनी कुणाच्या दबावाखाली राजीनामा दिला? खासदाराच्या पुस्तकात धक्कादायक खुलासे
संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात काही गंभीर दावे केले आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी (२०२५) दिलेला राजीनामा हा केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे नव्हता. राऊत यांच्या मते, धनखड यांची स्वतंत्र राजकीय कार्यपद्धती केंद्र सरकारला खटकत होती, असं संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
पुस्तकातील दाव्यानुसार, धनखड दाम्पत्याने जयपूरमधील आपले घर विकून पैसे परदेशात पाठवल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. या माहितीच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एक फाईल तयार केली होती. याच फाईलचा धाक दाखवून तपास यंत्रणांनी धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, ज्यानंतर त्यांनी २१ जुलै रोजी आपल्या पदाचा त्याग केला, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.
माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या राजीनाम्यामागील ‘पडद्यामागची गोष्ट’ही राऊत यांनी मांडली आहे. ‘लवासा यांनी निवडणूक आचारसंहितेच्या आठ कथित उल्लंघनांसाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या निष्पक्ष भूमिकेमुळे ईडीने त्यांच्या कुटुंबावर छापे टाकले आणि त्यांना सतत चौकशीच्या फेऱ्यात अडकवले. अखेरीस, २०२५ मध्ये दबावाखाली येऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला.
गुजरात दंगलींनंतरच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देताना राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी विरोधकांकडून सुरू होती, मात्र शरद पवार यांनी याला कडाडून विरोध केला होता. “राजकीय मतभेदांमुळे निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकणे ही चुकीची प्रथा ठरेल,” असा पवारांचा युक्तिवाद होता, असे राऊत यांनी नमूद केले आहे.
तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका कायदेशीर प्रकरणात जामीन मिळवून देण्यात शरद पवार आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी हे पुस्तक आपल्या तुरुंगवासाच्या काळात लिहिले असून, २०२५ मध्ये त्याची मूळ मराठी आवृत्ती प्रकाशित झाली होती. सोमवारी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आले, ज्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर यातील दाव्यांची चर्चा सुरू झाली आहे






