
संदेशखालीतील सरबेरिया-अगारती ग्रामपंचायतीच्या बामनघेरी परिसरात (वॉर्ड क्र. १४) राजकीय तणाव निर्माण झाला. मंगळवारी रात्री उशिरा, जेव्हा केंद्रीय सुरक्षा दलांसोबत पोलिसांचे एक पथक परिसरात गस्त घालत होते, तेव्हा समाजकंटकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.
दरम्यान, मंगळवारी, कोलकाताच्या न्यूटाऊन परिसरात एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या केल्याचा प्रकारही उघडकीस आला. या घटनेत टीएमसी समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या हत्येमुळे कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिस्थिती इतकी चिघळली की जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
बंगालमधील न्युटाऊनसह राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. हावडा येथील जगतबल्लभपूरमधील टीएमसी कार्यालयातला आग लावण्यात आली. त्यानंतर कोलकाताच्या हॉग मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला. जलपाईगुडी, दक्षिण २४ परगणा आणि आसनसोल यांसारख्या भागांमध्ये टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष आणि जाळपोळीच्या घटना घडल्याचीही माहिती समोर आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी हिंसाचाराच्या घटनांवर कठोर भूमिका घेतली आहे. हिंसाचार किंवा तोडफोड करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (डीजीपी), कोलकाता पोलीस आयुक्त आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे महासंचालक (डीजी) यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (एसपी) आणि पोलीस अधिकाऱ्यांना सतत गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने हे देखील स्पष्ट केले आहे की, निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. हिंसाचार आणि तोडफोड करणाऱ्यांना तात्काळ अटक केली जाईल.