
नवी दिल्ली : सध्या जवळपास सर्वच वाहनांवर FASTag लावल्याचे पाहिला मिळत आहे. पण आता ग्राहकांची ओळख पटवून देणारी प्रक्रिया अर्थात ‘केवायसी’ पूर्ण केलेली नसेल तर असे ‘फास्टॅग’ अकाऊंट 31 जानेवारीपासून बंद करण्यात यावीत, असे निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सोमवारी बँकांना दिले आहेत.
एनएचएआयनुसार, पथकर नाक्यांवरील पथकर संकलनाची व्यवस्था कार्यक्षम आणि जलद करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. एकाच फास्टॅगचा वापर वेगवेगळ्या वाहनांसाठी केला जातो. एका फास्टॅगचा वापर केवळ एकाच वाहनांसाठी व्हावा, या दृष्टीने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ धोरण राबविले जात आहे. याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांनी फास्टॅग संबंधाने ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
या फास्टॅगचे अनेक फायदे आहेत. फास्टॅगमुळे टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत मिळत आहे. इंधनाची बचतही होत आहे. टोल नाक्यांवर जास्त वेळ आता थांबावे लागत नाही. परिणामी, वेळ वाचत आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतूक समस्या कमी झाल्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांची दमछाक कमी होत आहे.