File Photo : Prakash Aambedkar
मुंबई : आगामी लोकसभेच्या सर्व ४८ जागा आम्ही लढविणार आहोत, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar ) यांनी केली. स्वतः आंबेडकर यांनीच ही घोषणा केल्याने देशभरात विरोधी पक्षांची स्थापन झालेल्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होण्याची शक्यता आता मावळली आहे.
वंचित बहुजन आघाडीने अलीकडेच ठाकरे गटाशी युती केली आहे. ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला किती जागा मिळणार आणि त्यातून वंचित बहुजन आघाडीला किती मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
इंडिया आघाडीकडून प्रतिसाद नाही
दुसरीकडे इंडिया आघाडीत सामील होण्याची इच्छा प्रकाश आंबेडकर यांनीच अनेकदा व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी पत्रव्यवहार देखील केला होता. इंडिया आघाडीकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अशी एकंदरीत स्थिती असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे.
अकोल्यातून निवडणूक लढवणार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच ४८ जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी २०२४ च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू, आमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मी स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली.