पालघर: आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार येथे आदिवासी विकास विभागामार्फत कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी डहाणू व जव्हार येथील आश्रम शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचा फतवा प्रकल्पांनी काढल्याने शिक्षकानी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आदिवासी संघटनांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे यंत्रणांचा गैरवापर करणे हे चुकीचे असल्याची चर्चाही पालघर जिल्ह्यात सुरू आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जव्हार येथे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आज पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या 38 संघटनानी एकत्रित येत संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण समिती स्थापन केली आहे या समितीने एक जिल्हा एक रॅली काढण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी रॅलीसाठी पालघर येथे एकत्रित होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमात गर्दी होईल की नाही या भीतीमुळे आश्रम शाळेतील शिक्षकांना गर्दी जमवण्यासाठी उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या सर्व कामासाठी शिक्षकांचा वापर करण्यात येतो आता गर्दी जमवण्यासाठी पण शिक्षकांचा वापर होत असल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमास प्रत्येक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, शाळेतील विद्यार्थ्यांची देखभाल करण्यासाठी अधिक्षक अधिक्षिका वर्ग चार कर्मचारी असा पुरेसे कर्मचारी ठेवून बाकी सर्व कर्मचारी व शिक्षक यांनी उपस्थित राहावे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनाही जव्हार येथे उपस्थित राहण्यासाठी आपण निरोप द्यावा असे संदेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षकांनी सकाळच्या वेळेतील आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपवून स्वतःच्या तर काहींनी भाड्याच्या वाहनाने जव्हार गाठले आहे. एकंदरीत आदिवासी विकास विभागाच्या या फतव्या बद्दल नाराजी व्यक्त होत आहे.






