उन्हात गेल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखे वाटते? मग तातडीने करा 'हे' घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम
उन्हाळ्यात सतत चक्कर का येते?
चक्कर येत असल्यास कोणते उपाय करावेत?
उन्हाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यावी?
राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात वाढ झाली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात उष्णता वाढते आणि आरोग्य बिघडते. वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. चक्कर येणे,अशक्तपणा जाणवणे किंवा अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे अशा समस्या उद्भवू लागतात. कडक उन्हात बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा प्रवास करताना पाण्याचे आवश्यक प्रमाणात सेवन न केल्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर फिरायला जाताना पाणी सोबत घेऊन जावे. बऱ्याचदा साधी चक्कर आल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. उष्माघाताची समस्या उद्भवल्यानंतर कोणत्याही क्षणी चक्कर येऊ शकते. शरीरसंबंधित दिसणारी हे लक्षण धोक्याचे मानले जाते.(फोटो सौजन्य – istock)
उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखी वाटत असेल तर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन किंवा जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ दोन्ही घटक बाहेर पडून जातात. याच्या परिणामामुळे कमी रक्तदाब होऊन मेंदूच्या पेशींना योग्य रक्तपुरवठा होत नाही. मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा न झाल्यामुळे अचानक कोणत्याही वेळी चक्कर येते. याशिवाय जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे, जाड कपडे घातल्यास किंवा गरम जागेत उभे राहिल्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटल्यास हे घरगुती उपाय नक्की करून पहा.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. शरीर हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्यासाठी पाणी प्यावे. दिवसभरात ३ ते ४ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन किंवा पचनसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. याशिवाय लिंबूपाणी, नारळ पाणी, ताक आणि इतर पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील मीठ आणि पाण्याचे संतुलन कायम टिकून राहते. कडक उन्हात कुठेही बाहेर जाताना पाण्याची बाटली, छत्री सोबत घेऊन जावी. उन्हापासून रक्षण करण्यासाठी छत्री फायदेशीर ठरेल.
दुपारच्या वेळी कडक उन्हात कुठेही बाहेर जाणे टाळावे. जास्त आवश्यकता असल्यास ४ नंतर बाहेर जावे. कुठेही बाहेर जाताना उपाशी पोटी बाहेर जाऊ नये. पोटभर अन्नपदार्थ खाऊनच बाहेर जावे. या दिवसांमध्ये हलका, पौष्टिक आहार, फळे, भाज्या, कोशिंबीर आणि जास्त पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. अचानक चक्कर आल्यास साखर पाणी प्यावे. किंवा वारंवार चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. तसेच उन्हाळ्यात अतिशय सैल आणि सुती कपडे घालावेत.
देशातील 70% महिलांना PCOS-PCOD, वाढतोय वंध्यत्वाचा धोका; Swami Ramdev नी सांगितला रामबाण उपाय
सतत चक्कर येत असल्यास रिहायड्रेशन सोल्युशन प्यावे. शरीरात उष्णता वाढल्यास कपाळावर किंवा मानेला थंड पाण्याची पट्टी ठेवावी. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर जास्तच अशक्तपणा किंवा थकवा असल्यासारखे वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात येणारी चक्कर काहींना साधी वाटत असली तरीसुद्धा शरीरासाठी धोक्याची ठरू शकते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत.






