
Health Update: कर्करोगावरील उपचार महागणार? केमोथेरपीच्या औषधांच्या किमतीत १० ते ५० टक्के वाढ
अमेरिका-इराण संघर्ष म्हणजे केवळ कच्च्या तेलाचा पुरवठा इतपत मर्यादित न राहता आरोग्य, आजार, उपचार असा व्यापक परिणाम झाला असल्याचे वारंवार समोर येत आहे, आखाती युद्धाच्या परिणामामुळे कर्करोग रुग्णांचे उपचार दर वाढणार आहेत. कारण कर्करोग उपचारातील महत्वाची केमोथेरपी असून यातील औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. कर्करोग उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या सिस्प्लॅटिन आणि काबर्बोप्लॅटिन या औषधांच्या किमती वाढविण्यास केंद्र सरकारने तत्त्वतः मंजुरी दिल्याने काही औषधांच्या दरात १० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता फार्मा इंडस्ट्री आणि तज्ज्ञ ही सांगत आहेत.(फोटो सौजन्य – istock)
दरम्यान, औषध उत्पादक कंपन्यांनी पुन्हा उत्पादन सुरू केले असले तरी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान एक महिना लागू शकतो, असे फार्मा साखळीतील प्रत्ययदर्शी सांगतात. त्यामुळे कर्करोग उपचारांतील अत्यावश्यक आणि तुलनेने स्वस्त मानल्या जाणाऱ्या सिस्प्लॅटिन व कार्बोप्लॅटिन औषधांच्या तुटवड्यामुळे देशभरातील हजारो रुग्णांवर आर्थिक व वैद्यकीय परिणाम होण्याची शक्यता आहे.
एका केमोथेरपी सत्राचा खर्च दोन हजार ते ३ हजार रुपयांनी वाढू शकतो. बहुतांश रुग्णांना ४ ते ६ किंवा त्याहून अधिक केमो सायकल्स घ्याव्या लागतात. त्यामुळे एकूण उपचार खर्चात हजारो रुपयांची अतिरिक्त भर पडणार आहे.या स्थितीचा फटका मुंबईतील रुग्णालयांनाही पडत असून मुंबईतील कामा व अल्ब्लेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, सिस्प्लॅटिन, कार्बोप्लॅटिन आणि ऑक्सालिप्लॅटिन या प्लॅटिनम-आधारित औषधांच्या पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
त्यामुळे डॉक्टरांना काही रुग्णांसाठी नेहमीची उपचार पद्धत बदलावी लागत असल्याचे सांगितले. ही औषधे फुफ्फुस, तोंड, गर्भाशय मुख (सायकल), अंडाशय, स्तन, वृषण आणि पित्ताशयाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. अनेक कर्करोगासाठी ही औषधे ‘फर्स्ट लाईन थेरपी ‘चा महत्वाचा भाग मानली जात असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन ही औषधे राष्ट्रीय अत्यावश्यक औषध यादी अंतर्गत किंमत नियंत्रणाखाली आहेत. मात्र कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यानंतरही उत्पादक कंपन्यांना दर वाढविता येत नव्हते. त्यामुळे उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यांच्यातील तफावत वाढली व अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केले किंवा थांबवले.