
जून २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासानुसार भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक एकाकीपणा अनुभवणारा देश ठरला आहे. ३६ देशांमधील नागरिकांच्या भावनिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि एकाकीपणाच्या अनुभवांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. डिजिटल मनोरंजन मंच JB.com यांनी प्रसिद्ध केलेल्या या अहवालात तुर्की पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अहवालानुसार भारताचा “लोनलीनेस स्कोअर” ८९ इतका नोंदवण्यात आला आहे. तुर्कीचा स्कोअर १०० असून त्यानंतर भारत आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. भारतातील सुमारे ५८ टक्के नागरिकांनी आपण एकाकीपणाची भावना अनुभवत असल्याचे सांगितले, तर ३४ टक्के लोकांनी सामाजिकदृष्ट्या अलिप्त असल्याचे नमूद केले आहे.
विशेष म्हणजे भारतात संयुक्त कुटुंबपद्धती आणि कौटुंबिक नातेसंबंध अजूनही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. देशातील केवळ ३.७ टक्के घरे ही एकट्या व्यक्तीची आहेत आणि सरासरी कुटुंबाचा आकार चारपेक्षा अधिक सदस्यांचा आहे. तरीही लोकांमध्ये एकाकीपणाची भावना वाढत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की भारतातील एकाकीपणा हा प्रामुख्याने शारीरिक नसून भावनिक स्वरूपाचा आहे. म्हणजेच अनेक लोक कुटुंबीयांसोबत किंवा इतर सदस्यांसोबत राहत असले तरी त्यांना भावनिक आधार, समजून घेणारे संबंध किंवा संवादाची कमतरता जाणवते. त्यामुळे गर्दीतही एकटे असल्याची भावना निर्माण होत आहे. याशिवाय भारतातील ३७ टक्के नागरिक वारंवार दुःखी असल्याचे आढळून आले आहे. हा आकडा पहिल्या पाच क्रमांकावरील देशांमध्ये सर्वाधिक आहे. यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हाने आणि भावनिक ताणतणाव वाढत असल्याचे संकेत मिळतात.
दरम्यान, तुर्कीमध्ये ६१ टक्के लोकांनी एकाकीपणा जाणवत असल्याचे सांगितले असून ४५ टक्के लोक स्वतःला सामाजिकदृष्ट्या वेगळे समजतात. तेथे जवळपास प्रत्येक पाचपैकी एका घरात एकच व्यक्ती राहते. मात्र भारताच्या बाबतीत कुटुंबीयांसोबत राहूनही भावनिक तुटलेपणा वाढत असल्याची बाब अधिक चिंताजनक मानली जात आहे. हा अभ्यास आधुनिक जीवनशैली, डिजिटल संवाद, वाढती स्पर्धा आणि कमी होत चाललेले प्रत्यक्ष मानवी संबंध यामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधतो. त्यामुळे भावनिक आरोग्य, संवाद आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.