हाराष्ट्र हे देशातील हिंसाचाराचे केंद्रबिंदू म्हणून उदयास येत आहे (फोटो - istock)
दिल्ली : नवराष्ट्र ब्युरो : ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी ॲण्ड सेक्युलॅरिझम’ (सीएसएसएस) च्या अहवालानुसार, भारतात 2024 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत जातीय, धार्मिक हिंसाचारात 84 टक्के वाढ झाली आहे. ‘हेजमनी ॲण्ड डिमोलिशनः द टेल ऑफ कम्युनल रायट्स इन इंडिया इन 2024’ या शीर्षकाच्या अहवालात असे आढळून आले की एकूण जातीय घटनांची संख्या 59 झाली आहे, जी 2023 मध्ये झालेल्या 32 दंगलींपेक्षा लक्षणीय वाढली आहे. हिंसाचारात मारल्या गेलेल्या 13 लोकांपैकी 10 मुस्लिम होते. देशभरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन हिंदूंनाही आपले प्राण गमवावे लागले. सीएसएसएस नुसार 59 पैकी 49 जातीय दंगली अशा राज्यांमध्ये घडल्या जिथे भाजप स्वबळावर किंवा इतर पक्षांशी युती करून सत्तेत आहे. महाराष्ट्रात 59 पैकी 12 दंगली घडल्या आहेत. महाराष्ट्र देशात जातीय हिंसाचाराचे केंद्र म्हणून उदयास आले, जिथे 59 पैकी 12 दंगली घडल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारचा क्रमांक लागतो जिथे 2024 मध्ये धार्मिक किंवा जातीय हिंसाचाराची प्रत्येकी 07 प्रकरणे नोंदवली गेली. भाजपशासित राज्यांनी जातीय हिंसाचार आणि धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी फारच कमी कारवाई केली आहे यावरूनही ही आकडेवारी स्पष्ट होते. या राज्यांमध्ये, राज्य अधिकाऱ्यांनी मुस्लिमांविरुद्ध बुलडोझरचा वापर केला. क्षुल्लक वादाला जातीय, धार्मिक वळण लावण्यात येत आहे.
या अहवालात म्हटले आहे की, धार्मिक आधारावर समुदायांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीयवादावर आधारित द्वेषपूर्ण भाषणाचा वापर करण्यात आला. सांप्रदायिक जाणीवेच्या व्यापक वातावरणामुळे किरकोळ मुद्द्यांवरून सांप्रदायिक दंगली होणे सोपे झाले. अहवालात म्हटले आहे की, दोन वेगवेगळ्या धार्मिक गटातील लोकांमधील अगदी क्षुल्लक वादालाही जातीय वळण देणे सामान्य झाले आहे. धार्मिक उत्सवांदरम्यान सार्वजनिक ठिकाणी आक्रमक रॅली आयोजित करणे आणि अपमानास्पद घोषणा देणे हे सर्वांत सामान्य कारण आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
2024 मध्ये मीडियाने मॉब लिंचिंगच्या 13 घटनांची नोंद केली होती, असेही अहवालात म्हटले आहे. या लिंचिंगमध्ये 11 मृत्यू झाले. एक हिंदू, एक ख्रिश्चन आणि 09 मुस्लिम होते. अहवालात म्हटले आहे की, लिंचिंगच्या यापैकी सात घटना गोहत्येच्या आरोपांशी संबंधित होत्या. इतर खटले आंतरधार्मिक संबंध आणि मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक ओळखीसाठी लक्ष्य केल्याच्या आरोपांवरील होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
2024 मध्ये झालेल्या बहुतेक जातीय दंगली धार्मिक उत्सव किंवा मिरवणुकी दरम्यान झाल्या. यामध्ये जानेवारीमध्ये अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा समारंभात झालेल्या 04 दंगली, सरस्वती पूजा मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या 07 दंगली, गणेश उत्सवादरम्यान झालेल्या 04 दंगली आणि बकरी ईद दरम्यान झालेल्या 02 दंगलींचा समावेश होता. अहवालातील आकडेवारीवरून धार्मिक सणांचा वापर जातीय तणाव आणि राजकीय एकत्रिकरणासाठी कसा केला जात आहे हे अधोरेखित होते. अहवालात असेही म्हटले आहे की, जातीय दंगलींच्या संख्येत वाढ होण्याचे कारण अंशतः एप्रिल-मे 2024मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि गेल्या वर्षी झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका असू शकतात.