
सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक
सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध विकासकामांना गती देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठा, एमआयडीसी विस्तार, आयटी पार्क, ट्रक टर्मिनल, कन्व्हेन्शन सेंटर, पर्यावरण संवर्धन आणि उद्योगांसमोरील प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
बैठकीत सातारा एमआयडीसीच्या जुन्या व नव्या औद्योगिक क्षेत्रासाठी सुमारे १३.६९ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेमुळे औद्योगिक क्षेत्राला नियमित व पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होणार असून, भविष्यातील औद्योगिक विस्तारालाही आवश्यक आधार मिळणार आहे.
एमआयडीसीच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. महसूल व उद्योग विभागाने संयुक्त पाहणी करून प्रकरणांचा लवकर निपटारा करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या.
औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांवर होत असलेल्या दुहेरी ग्रामपंचायत कर आकारणीचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (MAS) यांनी मांडलेल्या मागणीची दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले.
सातारा आयटी पार्क प्रकल्पालाही बैठकीत गती मिळाली. प्रकल्पासाठी आवश्यक निधी महसूल विभागाकडे जमा करण्यात आला असून, जागेचा ताबा मिळताच विकासकामांना प्रारंभ करण्यात येणार आहे. साताऱ्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी पुढील महिन्यात पुण्यात आयटी कंपन्यांची विशेष परिषद आयोजित करून साताऱ्यातील गुंतवणुकीच्या संधी सादर केल्या जाणार आहेत.
याशिवाय, साताऱ्यात आधुनिक सुविधांनी सुसज्ज कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागांमध्ये ‘देवराई’ संकल्पनेवर आधारित व्यापक वृक्षारोपण करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
जुन्या एमआयडीसीतील ट्रक टर्मिनलचे काम लवकर पूर्ण करण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्रसिंह कुशवाह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सातारा जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.