
auto taxi cng
मुंबई : लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. त्यातच आता राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाणार आहे. याचा फायदा हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांना होणार आहे.
रिक्षा-टॅक्सी महामंडळाअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून रिक्षा व टॅक्सी चालकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यासोबतच शासनाचा जर्मन सरकारसोबत चार लाख तंत्रकुशल मनुष्यबळ पुरवण्याचा करार झाला असून, त्याअंतर्गत कुशल चालकांना परदेशी नोकरीसाठी जाण्याची संधी मिळेल. तसेच प्रत्येक रिक्षा-टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येणार आहे.
याशिवाय, चालक आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे. यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. अपघातात अचानक कोणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना शिकायचे असेल त्याना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल.