मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली होती. भाजपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
[read_also content=”समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला, सुषमा अंधारेंची भाजपावर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/sushma-andhare-criticism-on-bjp-about-andheri-by-election-337033.html”]
दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला निवडणूक बिनविरोध करण्याचे तसेच अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र आज भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाने घेतलेल्या निर्णयाचा आनंद झाला आहे, उशिरा का होईना पण योग्य निर्णय घेतला त्याचा आनंद आहे, असं पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, एकही अपक्ष उमेदवार राहिल्यास निवडणूक होणार, त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशा गोष्टी पटकन होत नाहीत, थोडा वेळ लागतो. मात्र भाजपाने घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यात एक वेगळा संदेश जाईल, व भाजपाने निर्णयाने आनंद झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.