
खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत
अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. सध्या समोर येणाऱ्या माहितीमुळे प्रकरणाची गंभीरता वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, सत्य बाहेर येणे अत्यावश्यक आहे. समाजातील सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला आणि प्रवृत्तीला मुळीच सहन केले जाणार नाही. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळणे हीच आपली प्राथमिकता आहे. विशेषतः अन्याय झालेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी.
शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सकडे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असून, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाचा पोलिस तपास सध्या सुरू आहे. येत्या काळात अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. असे सांगून डॉ. विखे पाटील म्हणाले, काही व्हिडिओंमधून नगर जिल्ह्यातील एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीच्या सहभागाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. तपास यंत्रणा आपले काम करत असून, कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होणारच आहे.
भोंदूबाबा खरात याच्यावर पहिला गुन्हा शिडर्डीत दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणाचा गोपनीय तपास शिर्डीतूनच करण्यात आला. याच तपासाच्या आधारावर आता नाशिक पोलिस तपास करत असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे. एकूणच शिर्डी कनेक्शन अत्यंत गंभीर असून, त्यात भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणाच्या गांभिर्यावर सातत्याने वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिर्डीसह नगर जिल्ह्यात या प्रकरणाची पाळेमुळे कितपत खोलवर रूजली आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चक्क Siddhivinayak मंदिरात चोरी! दानपेटीतून चोरले तब्बल ‘इतके’ रुपये; पोलिसांकडून तपास सुरु
या प्रकरणात ज्या लोकप्रतिनिधीच्या सहभागाचे संकेत मिळत आहेत, तो लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील प्रत्येक वादात असतो. असे का घडते, असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. ही केवळ योगायोगाची बाब आहे का, की त्यामागे काही वेगळे वास्तव दडले आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे डॉ. विखे पाटील म्हणाले. आपण निवडून देत असलेले लोकप्रतिनिधी खरोखरच समाजाच्या हितासाठी काम करतात का, की ते फक्त वादांमध्येच दिसून येतात, हा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
रमजान ईदच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. इदगाह मैदानावर उपस्थित राहून त्यांनी नागरिकाशी संवाद साधत एकोप्याचा आणि बंधुभावाचा संदेश दिला. शिर्डी ही सर्व धर्म समभाव जपणारी भूमी असल्याचे सांगत, साईबाबांच्या विचारातून समाजात एकता आणि सौहार्द वाढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.