(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
अमोल मिटकरी यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. नोव्हेंबर महिन्यात अजित पवारांच्या घराबाहेर आणि कार्यालयाजवळ अशीच एक अघोरी पूजा करण्यात आली होती. अशोक खरात आणि अजित दादांच्या अपघाताचा काही संबंध आहे का? याचा तपास होणे गरजेचे असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित दादांचा विषय मागे पाडण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यांना संपवण्याचे हे मोठे षडयंत्र असू शकते, अशी शंकाही मिटकरींनी व्यक्त केली.
या प्रकरणात केवळ सामान्य लोकच नाही, तर मोठे अधिकारी आणि साक्षर लोकही या भोंदू बाबाच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. मिटकरींच्या दाव्यानुसार, खरातकडे केवळ ५७ नाही, तर ५०० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती आहे. यामध्ये काही बड्या अधिकाऱ्यांच्या पत्नींचाही समावेश आहे का? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
अशोक खरातची संपत्ती दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. एका भोंदू बाबाकडे एवढा पैसा येतो कुठून? त्याला पाणी कोणाच्या काळात आरक्षित करून दिले गेले? कोणत्या मंत्र्यांनी त्याला संरक्षण दिले? हे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत. महायुती असो वा अन्य कोणी, या प्रकरणातील गुन्हेगारांना सरकार पाठीशी घालणार नाही, असा विश्वासही मिटकरींनी व्यक्त केला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पण अशोक खरातने आपल्या कृत्यांनी या परंपरेला काळीमा फासली आहे असं म्हणत मिटकरींनी हल्लाबोल केला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेला ‘करंगळी कापण्याचा’ प्रकार हा अघोरी कृत्यांचा कळस होता. या प्रकरणात व्हीएसआर कंपनीचे मालक आणि अनेक राजकीय नेत्यांचे धागेदोरे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व प्रकरणांमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही राजीनामा द्यावा लागला असून, आता पोलीस तपासात आणखी कोणते मोठे चेहरे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






