
अंकुश बुब/ संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू बाबा राजेंद्र गडगे याला अटक झाल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या सुरस कहाण्या ऐकू येऊ लागल्या आहेत. सुरुवातीला साधा गवंडी म्हणून या भोंदू बाबाने काम सुरू केले. वडगाव पान परिसरात अनेक जांच्या सिमेंटच्या टाक्या बनवून देण्याचे काम करणाऱ्या गडगे याने नंतर भोंदू बाबाचा अवतार धारण केला. असाध्य आजार बरे करून देण्याच्या नावाखाली त्याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात गडगे या भोंदू कडून दत्तधाम सरकार हे आश्रम सुरू करण्यात आले आहे. ३८ वर्षांपासून या ठिकाणी हा आश्रम सुरू आहे. या आश्रमात सुरू असलेल्या गैर प्रकाराची अनेक वर्षांपासून दबकी चर्चा सुरू होती. मात्र या गैरप्रकारबाबत कोणीही तक्रार केलेली नव्हती.
काही महिन्यांपासून हा आश्रम जास्त चर्चा विषय बनलेला आहे. या आश्रमाचा प्रमुख गडगे याला अटक झाल्यानंतर त्याचे खरे स्वरूप बाहेर आले. या आश्रमाच्या माध्यमातून त्याने आश्रमात येणाऱ्या नागरिकांचा गैरफायदा घेऊन कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली असल्याचे पुढे आले आहे. वडगाव पान गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वडगाव पान, मनोली, जोर्वे व कोल्हेवाडी या गावांच्या सीमेवर चार एकर परिसरामध्ये हा आश्रम सुरू आहे. पाच लाख रुपयांच्या सिंहासनावर हा भोंदू बाबा बसून उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपचार सांगत असतो. या ठिकाणी २५ ते ३० कामगार काम करत आहे.
तुमच्या अंतर्मनातील शक्तीने मी आजार बरा केला, गाठ पातळ करून नष्ट केली अशा भूलथापा मारून तो लोकांच्या जिवाशी खेळत होता, मंत्रोच्चाराच्या आधारावर अपत्यप्राप्तीसाठीही अनेक नागरिकांची लूट करण्यात आली आहे. असाध्य रोग हात न लावता ही बरा करण्याचा दावा केला जातो. शरीरातील गाठी, पोटाचे विकार, असे आजार बरे करतो. वयाच्या १२ व्या वर्षी दत्त मंदिर मंदिरात शेजारी जमिनीखाली असणाऱ्या एका ठिकाणावर आपण तपश्चर्या केली असल्याचे तो म्हणतो.
या आश्रमामध्ये प्रत्येक गुरुवारी व रविवारी मोठा दरबार भरतो. हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित असतात. आपण एकाही नागरिकाकडून पैसे घेत नाही असा त्याचा दावा आहे. येणारे लोक दान करतात याशिवाय हवन विधीसाठी आपण ठराविक रक्कम घेतो अस त्याचं म्हणणं आहे. अमावस्येच्या दिवशी गरिबांसाठी ३५०० रुपयांचे साधे हवन केले जाते. या आश्रमात हवन त्या नावाखाली सुवणी आणि चांदीचे भस्म वापरले जात होते. अन्नदानाच्या नावाखाली ३ हजार ते ५० हजार रुपयांची भेट रोख वसुली केली जात होती. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी पावतीवरस अन्नदान असे छापले जायचे. वीस वर्षांपासून हा आश्रम भरभराटीला आला आहे.