काटेपूर्णा जलसाठा घटला; पाणीटंचाई पार्श्वभूमीवर विहिरी अधिग्रहणाच्या सूचना (File Photo)
अकोला : यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने महापालिका क्षेत्रात आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक झाली. अध्यक्षस्थानी आमदार रणधीर सावरकर होते. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता विहिरी अधिग्रहित करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासह प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवरून नव्या जलवाहिन्या टाकण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
यावेळी महापौर शारदा खेडकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, भाजपा शहराध्यक्ष जयंत मसने, उपमहापौर अमोल गोगे, गटनेता पवन महल्ले आदी उपस्थित होते.
खेडी सांगळूद-धोतर्डी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
प्रभाग क्रमांक १, २ व ३ मधील काही भागांसाठी चोहोट्टा बाजार येथून ८४ खेडी योजनेच्या अस्तित्वातील जलवाहिनीवरून जोडणी करून ३५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याची सूचना देण्यात आली. प्रभाग क्रमांक ४ साठी सांगळूद-धोतर्डी ६४ खेडी योजनेवरून जलवाहिनी टाकण्याबाबतही निर्देश देण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक १९ आणि बार्शीटाकळी तालुक्यातील मोठ्या विहिरी अधिग्रहित करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अनेक विकासकामांबाबत चर्चा
मोर्णा प्रकल्पातून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकणे, ताशी २० लाख लिटर क्षमतेचे पंप बसविणे तसेच दगडपारवा ते महान मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्याबाबतही चर्चा झाली. शहरातील मोठ्या विहिरी, हायड्रंट व हाय-यिल्ड बोअरवेल अधिग्रहित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, सहाय्यक अभियंता निखिल राऊत, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नरेश बावणे, श्रीकांत माणिकराव आदी उपस्थित होते.
काटेपूर्णा धरणात २१ दलघमी साठा
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा महान प्रकल्पात सध्या केवळ २१.३१३ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे पुन्हा नियोजन करून पाणी वाटपाच्या दिवसांमध्ये वाढ करण्याच्या सूचनाही आमदार सावरकर यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर






